Malegaon Sahakari Sakhar Karkhana : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Sahakari Sakhar Karkhana) वार्षिक सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालक मंडळाने विविध विषयांना मंजूरी दिली. विषय मंजूर-मंजूर अशा घोषणा देत संचालकांनी सभेतून काढता पाय घेतला. मोठ्या संख्येनं सभासद हे नाही-नाहीच्या घोषणा देत होते. या गोंधळातच विषय मंजूर करुन सभा गुंडाळण्यात आली. गोंधळाच्या वातावरणातच माईकची मोडतोड करुन सभासदांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळालं.


10 गावे सामावून घेण्यास विरोध सभासदांचा विरोध


बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दहा गावांचा समावेश करण्यासाठी ही सभा आयोजीत करण्यात आली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला. या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकूण 11 विषयावर चर्चा होणार होती. त्यातील 8 नंबरचा विषय हा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील 10 गावे ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्याचा विषय होता. जेव्हा 8 नंबरचा विषय चर्चेला आला तेव्हा सुरुवातीपासूनच या विषयाला अनेक सभासदांचा विरोध होता. गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालक मंडळाने सर्व विषयांना मंजूर-मंजूर अशा घोषणा देत सभेतून काढता पाय घेतला. मोठ्या संख्येने सभासद हे नाही नाहीच्या घोषणा देत होते. जवळपास 80 टक्के सभासद 10 गावे सामावून घेण्यास विरोध करीत होते.




तब्बल आठ तास ताळेबंदातील अहवालावर चर्चा


बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा कारखाना आहे. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दहा गावे वाढवण्यासाठी सर्वसाधारण सभेपुढे विषय मांडण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरु झाली होती. कारखान्याचे माजी संचालक आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे या बैठकीला उपस्थित होते. तब्बल आठ तास ताळेबंदातील अहवालावर चर्चा सुरु होती. अखेर कार्यक्षेत्रात गावे वाढवण्याच्या विषयावर सत्ताधारी संचालक मंडळाचे समर्थक आणि  विरोधी गटाचे सभासद यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालक मंडळाने हा विषय मंजूर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला जोरदार आक्षेप घेत विरोधी गटाच्या सभासदांनी देखील देखील नामंजूर करण्यासाठी हात उंचावून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. गोंधळाच्या वातावरणातच माईकची मोडतोड करून सभासदांनी गोंधळ घातला. अखेर संचालक मंडळाने हा विषय आवाजी मताने मंजूर सभेतून काढता पाय घेतला. 


कारखाना कायम राष्ट्रवादीच्या ताब्यात राहावा यासाठी हा कुटील डाव : रंजन तावरे


संचालक मंडळ निघून गेल्यानंतर देखील कारखान्याचे बहुतांश सभासद सभागृहात उपस्थित होते. कारखाना कायम राष्ट्रवादीच्या ताब्यात राहावा यासाठी हा कुटील डाव असल्याचा आरोप  रंजन तावरे यांनी केला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून दहा गावे वगळून माळेगावला जोडण्याचा प्रयत्न केले जात आहे. मात्र, त्यासाठी गुप्त मतदान घ्यावे अशी मागणी तावरे यांनी केली. याशिवाय संचालक मंडळाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तर जनतेचा कौल संचालक बोर्डाच्या बाजूनं असल्याचे कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे यांनी म्हटलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या: