Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहे. याचा केंद्रबिंदू राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार आहेत. 2024 ला नाही तर मी आताच मुख्यमंत्री होणार आहे, असं सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. सकाळ माध्यम समूहाच्यावतीने अजित पवार यांची 'दिलखुलास दादा' ही प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीत अजित पवारांनी (Ajit pawar) हे सूचक वक्तव्य केलं आहे.


अजित पवारांनी  हे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला होता. मागील काही दिवसांपासून अजित पवार महाराष्ट्रात राजकीय भूकंप करणार आणि ते भाजपात जाणार,अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांची मुलाखत झाली. यात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे.


... तर आर. आर. पाटील मुख्यमंत्री झाले असते!


अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाला उपमुख्यमंत्री पदाचं अजिबात आकर्षण नाही आहे. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळेल एवढं संख्याबळ राष्ट्रवादीकडे होतं. काही वेळा अनेक निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. हे सगळे निर्णय पक्षाची शिस्त राहण्यासाठी  हे निर्णय मान्य करावे लागतात. 2004 मध्ये काँग्रेसबरोबर आमची आघाडी होती. राष्ट्रवादीच्या 71 जागा निवडून आल्या होत्या आणि काँग्रेसच्या 69 जागा आल्या होत्या. मात्र त्यावेळी कॉंग्रेसला वाटत होतं की यावेळी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद दिलं जाईल. मात्र त्यावेळी दिल्लीतून उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार असं सांगण्यात आलं होतं. राष्ट्रवादीने आर. आर. पाटील यांची निवड केली होती. त्यावेळी जर मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आलं असतं तर आर. आर. पाटील मुख्यमंत्री झाले असते, असं ते म्हणाले.


दोघांनाही मुख्यमंत्री पदाचा अनुभव नाही...


अजित पवार पुढे म्हणाले की, मी दोन मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे  या दोघांनाही आमदारकीचा कोणताही अनुभव नव्हता. मी आणि पृथ्वीराज चव्हाण दोघेही 1991 साली दिल्लीत खासदार होऊन गेलो होतो. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण अनेक वर्ष खासदार होते. 2010ला त्यांनी राज्याची मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली होती. उद्धव ठाकरे यांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. मात्र दीड वर्ष ते मुख्यमंत्री होते. त्यांच्यासोबत आम्ही महाराष्ट्र सांभाळला, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या काळात आनंदाने आणि समाधानाने काम केलं आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यावेळी आम्ही नाईलाजाने काम केलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.