Pune News : पुण्यातील चार धरणांमध्ये जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच शहरातील 97 टक्के शौचालयांमध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ असल्याची माहिती आहे. यामध्ये सुलभ शौचालये तसेच बाकी शौचालयांचा  समावेश आहे. यंदा कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाने यापूर्वीच महापालिकांना पाणी बचतीच्या सूचना दिल्या आहेत. त्यातच शौचालयासाठी पिण्याचं पाणी वापरण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. 


पुणे महानगरपालिकेने (PMC) वेळीच पावले उचलून शौचालयासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी बोअरवेल किंवा इतर पाण्याचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची बचत होईल. शहरात सुमारे 1,160 स्वच्छतागृहे असून त्यामध्ये वापरल्या जाणार्‍या पाण्याच्या स्त्रोतांची माहिती नुकतीच घनकचरा व्यवस्थापन विभागाने गोळा केली.


प्राथमिक माहितीनुसार, या शौचालयांसाठी वर्षभरात 1.5-2 टीएमसी पिण्याचे पाणी वापरले जाते असा अंदाज आहे. परंतु शुद्धीकरण केंद्रातील सांडपाणी स्वच्छतागृहांच्या सर्वांगीण स्वच्छतेसाठी वापरले जाते. त्यामुळे काही प्रमाणात तरी पाण्याची बचत होत असल्याचेही दिसून येत आहे. महापालिकेने नियुक्त केलेली खासगी संस्था जेटिंग मशीन वापरून स्वच्छतागृहांची स्वच्छता करते. त्यामुळे कंत्राटदाराने स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेले सांडपाणी घेणे आवश्यक आहे.


2015 मध्ये पावसाअभावी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला. या काळात जवळपास वर्षभर पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्याच वर्षी, शौचालयातील पिण्याच्या पाण्याचा वापर कमी करण्यासाठी पालिकेने अनेक शौचालयांच्या भागात बोअरवेल खोदल्या. या बोअरवेलला जवळची शौचालये जोडण्याचेही नियोजन करण्यात आले होते. मात्र केवळ 28 ठिकाणी बोअरवेलचा वापर होत असल्याचे दिसून आले. अनेक भागात बोअरवेलच्या पाण्याचे नळ बंद असून जलवाहिन्या तुटल्याने पिण्याचे पाणी वापरले जात आहे.


शहरातील सार्वजनिक शौचालयांपैकी केवळ 28 ठिकाणी बोअरवेलचे पाणी वापरतात. महापालिकेने वेळोवेळी आवश्यकतेनुसार ही स्वच्छतागृहे बांधली आहेत. मात्र,ते उभारताना पिण्याच्या पाण्याची गरज असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. अनेक स्वच्छतागृहांच्या पाण्याच्या टाक्या सकाळीच भरतात. मात्र शौचालयातील नळ गळतीमुळे हे पाणी वाया जात असल्याचंही समोर आलं आहे.


यंदाची पाणीकपात टळली, मात्र...


पुणेकरांसाठी (Pune News) दिलासादायक बातमी आहे. पुणेकरांवर घोंघावणारं पाणी कपातीचं संकट तूर्तास टळलं आहे. पुणे आणि ग्रामीण परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवणार का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आज झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणीकपात होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 15 मेपर्यंत पुणेकरांची पाणीकपात टळली आहे. 15 मेनंतर पुन्हा एकदा संपूर्ण आढावा घेण्यात येणार असून त्यानंतर पाणीकपातीसंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.