Lonavala News : महाराष्ट्रातील लोणावळा, खंडाळा आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पर्यटकांना खाजगी बंगले भाड्याने देण्याचा ट्रेंड वाढला आहे. यामुळे व्यवसायाची स्पर्धा सुरू झाली असून मुंबईतील बंगले मालकांपासून अनेक स्थानिक तरुण या व्यवसायात उडी घेत आहेत. व्यवसायात प्रचंड पैसा असल्याने अनेकांनी या व्यवसायात रुचि दाखवली आहे.


पूर्वी मोजक्या लोकांच्या हाती असलेला पर्यटन व्यवसाय आता विस्तारत आहे. केवळ पर्यटनातून पैसा कमावताना येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेला आणि शहराला कुठेतरी बाजूला केले जात असल्याचं वारंवार घडणाऱ्या घटनांवरून समोर येत आहे. हॉटेल्समध्ये नियमांच्या भडिमारामुळे पर्यटकांनी खासगी बंगल्याना प्राधन्य दिलं. मात्र तरीही एवढी मोठी रक्कम घेताना पर्यटकांच्या सुरक्षेकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.


लोणावळ्यात गेल्या पंधरा दिवसांत दोन ठिकाणी दोन अपघात झाले. त्यात दोन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनांमुळे शहराच्या पर्यटन उद्योगाला गालबोट लागलं आहे. आठवडाभरापूर्वी आपटी येथील एका खासगी बंगल्यात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणारे सापडले होते. यापूर्वी लोणावळा आणि परिसरातील खासगी बंगल्यांमध्ये जुगार, सट्टा, पार्ट्या करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे.


पर्यटकांची माहिती घेणं अनिवार्य
हॉटेलमध्ये येणाऱ्या पर्यटकांची माहिती घेतली जाते, ओळखपत्र तपासले जातात, खासगी सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही तसेच संध्याकाळी स्विमिंग पूलवर जाणे, खाणे, मोठ्याने बोलणे, ओरडणे याबाबत काही नियम आहेत. पोलिसंही त्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ही सर्व बंधने टाळण्यासाठी पर्यटक जादा पैसे देऊन खासगी बंगल्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न करतात. मालकांकडून जास्त पैसे मिळत असल्याने येथील काही बंगले मालक नियमांची पायमल्ली करून अशा पर्यटकांना राहण्याची सोय करतात.


खासगी बंगल्यांमधील स्विमिंग पूल हा कळीचा मुद्दा बनला आहे. ती अधिकृत की अनधिकृत, नगरपरिषद आणि पीएमआरडीए लवकरात लवकर तपासून पाहतील, आवश्यक तेव्हा पोलिस कारवाई करतील. मात्र स्विमिंग पूलमध्ये अपघात होऊ नयेत, यासाठी बंगले मालक आणि त्यांच्या चालकांनीही काही नियम करणे गरजेचे आहे.


पर्यटकांनी स्वत:वर बंधनं घालणं आवश्यक
या व्यवसायावर कायदेशीर बंधने येण्यापूर्वी पर्यटकांनी स्वत:वर बंधने घालावीत. जागरूक नागरिकांनी ओळखपत्र तपासल्याशिवाय कोणालाही बंगला भाड्याने देऊ नका, पैसे आणि व्यवसायापेक्षा शहर आणि परिसरातील सुरक्षितता महत्त्वाची आहे, हे नेहमी लक्षात ठेवावे, असे आवाहन केले आहे.