इंदापूर : चंद्रावर जाण्यासाठी भारत दुसऱ्यांदा सज्ज झाला असून चांद्रयान-2 या महत्वाकांक्षी मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या 15 जुलैला मध्यरात्री हे चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. या मोहिमेसाठी ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या प्रक्षेपास्त्राचा वापर करण्यात येणार आहे. अवकाशात झेपावण्यासाठी लागणाऱ्या बूस्टरचे केसिंग इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविण्यात आले आहे.


अकरा वर्षापूर्वी 2008 मध्ये भारताने चांद्रयान मोहिम राबवली होती. त्यानंतर आता चांद्रयान- 2 मोहिम राबविण्यात येणार आहे. ‘जीएसएलव्ही मार्क -3’ या प्रक्षेपकाच्या साहाय्याने हे यान चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. या चांद्रयान-2 चे वजन सुमारे 3.8 टन असणार आहे. 6 सप्टेंबरनंतर चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे.


या मोहिमेसाठी वालचंदनगर कंपनीने 80 फुटापेक्षा जास्त उंच व 12 फुटापेक्षा जास्त डायमिटर असणारे बूस्टर तयार केले असून बुस्टरचे तीन भाग आहेत. या बुस्टरमध्ये घनस्वरुपात इंधन भरले जाते. मोहिमेच्या पहिल्या स्टेजसाठी याचा उपयोग होतो. बूस्टर यानाच्या उजवीकडे व डावीकडे वापरले जातात. तसेच यान हवेमध्ये झेपवल्यानंतर यानाला दिशा देण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या नॉझल कंट्रोल टॅंकेजची निर्मिती वालचंदनगर कंपनी यशस्वी केली आहे. चांद्रयान- 2 च्या यशानंतर भारत हा जगामध्ये या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करणारा पाचवा देश ठरणार आहे.


चंद्रावर जीवसृष्टी तसेच पाण्याचे अस्तित्व आहे की नाही, याचा शोध घेण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चांद्रयान 2 मोहिमेद्वारे चंद्रावर यान पाठविणार आहे.


वालचंदनालगर इंडस्ट्रीजचा अल्प परिचय


पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर या छोट्याशा गावी 1908 साली शेठ वालचंद हिराचंद यानी वालचंदनगर इंडस्ट्रीजची स्थापना केली. त्यावेळी साखर कारख्यान्यांची निर्मिती व सिमेंटच्या प्लॅंटच्या निर्मितीची कामे ही कंपनी मोठ्या प्रमाणावर करत असे. कंपनीने महाराष्ट्रासह देशात व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अशा कारखान्यांची निर्मिती केली.


गेल्या 45 वर्षापासून ही कंपनी देशाच्या सरक्षंण, अणूऊर्जा व अवकाश संशोधन क्षेत्रात काम करीत आहे. तसेच आण्विक पाणबुडीचे महत्वाचे भाग ही कंपनी तयार करत आहे. चांद्रयान 1 मोहिमेबरोबरच मंगळ यान मोहीम तसेच एकाच वेळी 100 पेक्षा अधिक उपग्रह सोडण्यासाठी पहिल्या स्टेजमधील महत्त्वाची बूस्टर केसिंग वालचंदनगर कंपनीच्या अभियंत्यांनी बनवल्या आहेत.


चांद्रयान-2 या मोहिमेद्वारे ऑर्बिटर, लैंडर आणि रोवर पहिल्यांदाच चंद्रावर पाठवलं जाणार आहे. या मोहिमेसाठी तब्बल 800 कोटींचा खर्च येणार आहे. ही मोहिम यशस्वी झाली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर उतरवणारा भारत हा जगातला चौथा देश बनणार आहे.

चंद्रावर पाणी असल्याचा शोध चांद्रयान एकच्या मोहिमेत लागला होता. आता चांद्रयान दोन मोहिमेत तिथल्य़ा वातावरणासह माती परिक्षणाची जबाबदारी असणार आहे. चांद्रयान 2 हे गेल्या 11 वर्षांपासून उड्डाणाच्या प्रतिक्षेत होत. 2008 साली चांद्रयान 1 ने उड्डाण घेतलं. त्यानंतर जगापाठीवर भारताची नवी ओळख निर्माण झाली. 2013 साली चांद्रयान 2 झेपावणार होतं. मात्र रशियानं प्रकल्पातून माघार घेतल्यानं उड्डाण रखडलं. असंख्य आव्हानं आणि अडचणींना मात करत अखेर चांद्रयान 2 झेपावणार आहे.

Chandrayaan 2 | चांद्रयान 2 झेप घेण्यास सज्ज, चंद्रावर रोवर उतरवणारा भारत जगात चौथा देश | ABP Majha



कशी असेल मोहिम चांद्रयान2 ?

  • चांद्रयान 2 चं लॉन्चिंग 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान होणार आहे

  • 6 सप्टेंबर 2019ला चांद्रयान चंद्रावर उतऱण्याची शक्यता आहे

  • चांद्रयान 2 साठी तब्बल 800 कोटींचा खर्च लागणार आहे


चांद्रयान2 मोहिमेची वैशिट्य काय?

  • चांद्रयान तब्बल 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतर पार करुन चंद्रावर पोहोचणार

  • चंद्रावर पोहोचण्यासाठी चांद्रयान दोनला 55 दिवसांचा कालावधी लागणार

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर प्रज्ञान उतरेल

  • चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान चंद्रावरची माहिती कंट्रोल सेंटरला पाठणार


चांद्रयान2 मोहिमेतील अडचणी आणि आव्हान

  • अंतराळात चंद्राच्या गतीबरोबरच चांद्रयान दोनच्या गतीवर नियंत्रण ठेवणे

  • चांद्रयान दोन पृथ्वीपासून 3 लाख किमींच्या अंतरावर असल्यानं त्याच्याशी संपर्क कायम ठेवणे

  • चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर रोवर आणि लँडर विक्रम उतरवणे

  • चंद्रावरच्या तापमानासह धुळीचाही मोहिमेवर परिणाम होऊ शकतो