(Source: ECI/ABP News)
Ghotawade Phata Pune Fire : पुण्यातील घोटावडे फाट्याजवळील कंपनीला भीषण आग, 18 जणांचा मृत्यू
पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीची प्रयत्न सुरू आहे.

पुणे : पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून एक कर्मचारी बेपत्ता आहे. आग लागली त्यावेळी कंपनी 37 कर्मचारी होते त्यापैकी 18 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
आता आग आटोक्यात आली असून कुलिंग आणि कर्मचाऱ्यांच सर्च ऑपरेशन सुरू आहे. आग लागलेली कंपनी ही मुळशीतील उरवडे गावाच्या हद्दीत आहे. आग लागलेली कंपनीत क्लोरीन क्लोराईड बनवण्याचे काम करण्यात येत होते. क्लोरीन क्लोराईड असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. क्लोरीन क्लोराईडचे बॉक्स असल्यानं आग धूमसत गेली आहे. आगीत आतापर्यंत 18 जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला असून पीएम आरडीए अग्निशमन दलाचे अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आगीच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. कंपनी मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत कंपनीत मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही घटना अतिशय दु:खद आणि वेदनादायी आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परतावेत ही प्रार्थना. ही घटना समजल्यापासून सतत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेची सातत्याने माहिती घेत आहे.
अतिशय दु:खद!
— Supriya Sule (@supriya_sule) June 7, 2021
उरवडे,मुळशी येथे एका कंपनीत लागलेल्या आगीत काही कामगारांचा मृत्यु झाला.ही घटना अतिशय वेदनादायी आहे.मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परतावेत ही प्रार्थना.
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.




















