Western Maharashtra Cooperative Movement : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) राज्यातील सत्ताधारी महायुती (Mahayuti) जबर फटका बसला. राज्यातील 48 पैकी 30 जागा जिंकत महाविकास आघाडीने (Maha Viksas Aghadi) महायुतीचा धुव्वा उडवला. सांगलीचे विशाल पाटील यांनी सुद्धा काँग्रेसला पाठिंबा देत काँग्रेसचे सदस्य बळ 14 वर नेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहिला. त्यांनी 13 जागा जिंकल्या. ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या. राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यात काँग्रेसचा नव्याने झालेला उदय हा सुद्धा त्यांना आशेचा किरण ठरला. जो पक्ष मरणासन्न अवस्थेत गेला होता त्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत मारलेली मजल पाहता कार्यकर्त्यांना चांगलंच बळ आलं आहे. महायुतीमध्ये भाजपाला नऊ जागा मिळाल्या, तर शिवसेना शिंदे गटाला सात जागा मिळाल्या. अजित पवार गटाला योग एका जागेवर समाधान मानावे लागले.  


लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पश्चिम महाराष्ट्रासह (Western Maharashtra) मराठवाड्यामध्ये जबर फटका बसला. मराठवाड्यामध्ये झालेली पीछेहाटमध्ये याच्यामध्ये जरांगे फॅक्टर असला, तरी पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर, या मतदारसंघांमध्ये महायुतीला दणका बसला आहे. पुण्याची आणि सातारची जागा महायुतीला मिळाली. सातारची जागा उदयनराजे भोसले यांनी जिंकले असले तरी तो आनंद व्यक्त करण्यासारखा समाधान देणार नाही. त्यामुळे सहकार पट्ट्यामध्ये महायुतीला दणका बसला आहे. 


सहकारात पाय घट्ट करण्याचा प्रयत्न


केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्थापन झाल्याने  मंत्र्यांचा शपथविधी होऊन खातीवाटप करण्यात आली आहेत. राज्यात सहा मंत्रिपदे मिळाली आहेत. भाजपकडून पियूष गोयल, नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा संधी मिळाली आहे. मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव आणि रामदारास आठवले यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.  मोहोळ यांना सहकार आणि नागरी विमान वाहतूक या मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून शपथ घेतलेले एकमेव मंत्री आहेत. त्यांच्या दिमतीला सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शाह असतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात या खात्याची निर्मिती करून अमित शाहांकडे जबाबदारी देण्यात आली होती. 


हर्षवर्धन पाटील यांची सुद्धा राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदी निवड


मराठवाड्याला आणि कोकणला मंत्रीमंडळात संधी मिळालेली नाही. पश्चिम महाराष्ट्रातून मराठा चेहरा असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदी संधी देण्यात आल्याने पश्चिम महाराष्ट्रात सहकारात पाय घट्ट करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांचे रिपोर्टिंग अमित शाह यांना असेल. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्येच भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सुद्धा राष्ट्रीय साखर महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 


काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच प्राबल्य


कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर येथील सहकार पट्टा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. महाराष्ट्राचे राजकारण या पश्चिम महाराष्ट्रभोवतीच फिरत आहे. याच बालेकिल्ल्यात भाजपला उमेदवार देण्यापासून ते निवडून आणण्यापर्यंत बराच संघर्ष करावा लागला. मात्र, हाती काहीच लागलेलं नाही. 


पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीचा संबंध सर्वसामान्य शेतकऱ्यांसह चुलीपर्यंत असल्याने पतसंस्था, राज्य सहकारी बँक, जिल्हा बँका यांचं राजकारण याच पट्ट्यांमध्ये आहे. बहुतांश अर्थकारण या संस्थांमधून होत असतं. या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या पट्ट्यामध्ये बस्तान बसवण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांना संधी देण्यात आल्याचे समजते. आपल्या सर्व संस्थांवर आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच प्राबल्य राहिलं आहे. 


कोल्हापूर विभागामध्ये 40 साखर कारखाने


पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने सुद्धा निर्णायक भूमिका बजावत असतात. एक कारखाना नाही म्हटली, तरी वीस हजार मतांवरती प्रभाव टाकू शकतो. फक्त कोल्हापूर विभागांमध्ये 40 साखर कारखाने आहेत. तेवढ्याच पटीमध्ये पुणे विभागांमध्ये साखर कारखाने आहेत. त्यामुळे साखर कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा राजकीय आणि सामाजिक अर्थकारण बरंच दडलं आहे. मराठा लाॅबीचे अनेक साखर कारखाने याच विभागात आहेत. त्यामुळे या पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्यासाठी भाजपकडून खेळी करण्यात आली आहे. 


लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेती मालाचा पडलेला भाव महायुतीच्या दारुण पराभवासाठी कारणीभूत ठरला. इथेनाॅल बंदी, उत्तर महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंदी सुद्धा शेतकऱ्यांच्या मुळावर आली. सोयाबीन आणि कापसाचा घसरलेला दर सुद्धा चिंतनाचा विषय होता. मोदी सरकारकडून राजकीय सोयीसाठी ज्या भूमिका घेण्यात आल्या त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे ही पोकळी आता भरून काढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रावर जाणीवपूर्वक भाजपकडून लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे मोहोळ यांच्या मंत्रीपदातून दिसते. 


इतर महत्वाच्या बातम्या