Amol Kolhe :   राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. बैलगाडा शर्यतींच्या परवानगीबाबत आज सुप्रीम कोर्ट अंतिम निकाल दिला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचे शौकिनांनी आनंद व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार आमोल कोल्हे यांनी मोठी घोषणा केली आहे. बैलगाडा शर्यतीवर चित्रपट लवकरच शौकिनांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे आता बैलगाडा थरार, मेहनत आणि त्यासाठी संपूर्ण लागणारी तयारी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचणार आहे.


खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, "बैलगाडा शर्यतीवर चित्रपट काढण्याची तयारी सुरु झाली आहे. लवकरच हा दिमाखदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बैलगाडा मालकाचे कष्ट, त्यांचं बैलांसोबत असलेलं नातं हे सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे." यासंदर्भात मागील अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दबावतंत्र वापरलं जातं आहे. हे अनेक वर्ष संसदेत हा विषय मांडताना मी अनुभवत आहे. या आंतरराष्ट्रीय दबावतंत्राचा देखील बुरखा पाडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


बैलगाडा शर्यत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे


ते पुढे म्हणाले की, "काही गोष्टी आपल्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी मांडाव्या लागतात. स्वराज्यरक्षक संभाजी मालिका 157 देशांमध्ये पोहोचली. त्यावेळी संभाजी महाराजांचा खरा इतिहास घराघरातील मुलांपर्यंत पोहोचला. त्यानंतर शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्ताने प्रत्येक शहरात मोठ्या संख्येने प्रेक्षक इतिहास अनुभवत आहे. त्याचप्रमाणे बैलगाडा शर्यत महाराष्ट्राच्या मातीचा श्वास आहे. ती याच पद्धतीने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली पाहिजे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विदेशी लोक येतील आणि या शर्यतीचा एक मोठा सोहळा होईल, अशा पद्धतीने हा चित्रपट तयार केला जाणार आहे." 


'याचसाठी केला होता अट्टाहास'


"राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी सुप्रीम कोर्टाने हटवली आहे. ही नक्कीच आनंदाची बाब आहे. सगळ्या बैलगाडा शर्यतप्रेमींसाठी हा दिवाळी, दसऱ्यासारखा दिवस आहे. बैलगाडा शर्यतीला परवानगी देताना सुप्रीम कोर्टाने काही अटी घालून दिल्या आहेत. आनंदाची बाब असली तरीदेखील ही मोठी जाबाबदारीही आहे. सुप्रीम कोर्टाच्या सर्व नियमांचं पालन करुन यापुढील बैलगाडा शर्यती दिमाखदार पद्धतीने पार पडतील," असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. याचसाठी केला होता अट्टाहास, ही भावना प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येक बैलगाडा मालकाचं, शौकिनांचं आणि प्रेमींचं हे मोठं यश आहे. यातून परंपरेचं जतन होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचंही ते म्हणाले.