मुंबई: शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना देहू येथे श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार देण्यात आला. आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आहे. कारण, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला देहू येथील वारकऱ्यांनी दिला. हा माझ्या एकट्याचा पुरस्कार असून तो वारकरी, धारकरी, शेतकऱ्यांचा आणि लाडके भाऊ-बहिणींचा असल्याचे एकनाथ शिंदेंनी म्हटले. मुख्यमंत्री असताना तीर्थक्षेत्राबाबत जे निर्णय घेतले, त्यामुळे हा पुरस्कार मला दिला. वारकरी समाज प्रबोधन करतात, त्यांच्याकडून मिळालेला हा पुरस्कार सर्वात मोठा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटले. या पुरस्कार सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची (Aurangzeb) कबर हटविण्यासंदर्भात सुरू असलेल्या मागणीवरही आपली भूमिका मांडली. औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन सुरू असलेल्या वादावर पहिल्यांदाच शासनाच्यावतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. शिवभक्तांच्या भावनांचा आदर मी करतो, औरंगजेबान संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. संभाजी महाराज यांचे शौर्य आणि औरंगजेबाचे क्रौर्य, त्या क्रौर्याची परिसीमा त्याने गाठली होती. अशा औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना शिवभक्तांची आहे, तीच माझी भावना आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये. क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये. तो महाराष्ट्राचा दुश्मन होता, देशद्रोही, राष्ट्रद्रोही होता, अशा या औरंग्याच्या खाणाखुणा महाराष्ट्रात कशाला पाहिजे. जे उदात्तीकरण करतात त्यांचा निषेध केला पाहिजे, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
काँग्रेसला टोला, हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पलटवार
दरम्यान, काँग्रेस म्हणजे औरंगजेबी वृत्ती असल्याचे त्यांच्या कृत्यातून दिसते. काँग्रेसने संभाजी महाराज यांचा चित्रपट बघावा आणि मग उदात्तीकरणाचा विचार करावा, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले. तसेच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना औरंगजेबाची उपमा दिल्यावरूनही त्यांनी पलटवार केलाय. औरंग्याची क्रूरता बघा, मी मुख्यमंत्री होतो तेव्हा देवेंद्रजी टीममध्ये होते आता ते मुख्यमंत्री आहेत आमची टीम आहे. आम्ही जो काही कारभार केला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम केलं आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, असा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. तोच आदर्श छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचं होता, कोणाची तुलना करत आहात तुम्ही जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे, असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पटलवार केला.
हेही वाचा
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल