नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याच्या आधी निवडणूक प्रचारात अदानी आणि अंबानींची एन्ट्री झालीय. यावेळी गौतम अदानी आणि अंबानींचा विषय काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) नाही तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काढल्यानं सर्वाच्या भुवया उंचावल्यात. तेलंगणातल्या प्रचारसभेत मोदींनी अदानी, अंबानींवरून थेट राहुल गांधी आणि काँग्रेसवरच आरोपांच्या फैरी झाडल्या. ऐन निवडणुकीत राहुल गांधी हे अदानी आणि अंबानींवर गप्प का आहेत असा सवाल करत काँग्रेसने अदानी, अंबानींकडून पैसा घेतल्याचा घणाघाती आरोप पंतप्रधानांनी केला. 


या आधी राहुल गांधींची अदानी-अंबानींवर टीका


याआधी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार केवळ अदानी, अंबानींसाठीच काम करत असल्याचा आरोप सातत्यानं केला आहे. अदानींच्या यशाचं रहस्य काय आणि मोदींचं त्यांच्याशी नेमकं नातं काय असा थेट सवाल राहुल गांधींनी भर संसदेत केला होता. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अदानी आणि अंबानी यांच्यावरून राहुल गांधींना सवाल केला आहे. 


नरेंद्र मोदींचा सवाल


पण राहुल गांधींच्या यापैकी कोणत्याच आरोपांना मोदींनी कधीच थेट उत्तर दिलं नव्हतं. राहुल गांधींच्या आरोपांनंतरही मोदींनी संसदेत अनेकदा भाषण केलं, पण त्यात अदानींचा साधा उल्लेखदेखील केला नाही.या मुद्द्यांवर आतापर्यंत गप्प असणाऱ्या मोदींनी ऐन निवडणुकीत स्वत:च अदानी, अंबानींचं नाव घेत राहुल गांधींवरच आरोप केलाय. त्यासाठी निवडणुकीचे तीन टप्पे संपल्यानंतर  चौथ्या टप्प्याचा मुहूर्त मोदींना का शोधून काढला हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


 




प्रियंका गांधींचं प्रत्युत्तर


देशाची सगळी संपत्ती कुणाला बहाल केली आहे हे मोदींनी एकदा जाहीर करावं, मग आम्ही त्यांच्या सगळ्या प्रश्नांच उत्तरं देऊ असं जोरदार प्रत्युत्तर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी दिलं आहे. त्या म्हणाल्या की, मोदींनी आमच्यासोबत एकाच स्टेजवर यावं, आम्ही त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. अदानी आणि अंबानी यांच्यावर पंतप्रधान अचानक इतके स्पष्टीकरण का देत आहेत? शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. देशाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याशिवाय पंतप्रधानांनी गेल्या दहा वर्षांत काय केले? निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर काय निकाल असेल याचा अहवाल पंतप्रधानांना मिळाला असावा, म्हणून आता हे धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करत आहेत. हे लोक धर्माच्या नावावर राजकारण करत आहेत.


ही बातमी वाचा: