मुंबई : मुंबईमध्ये पावसाने (Mumba Rain) थैमान घातले असून रात्रभर सुरु असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. मुंबईत 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचले असून रेल्वे सेवाही विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. मुंबईच्या अवस्थेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे. 


मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून मुंबईकरांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. तर आता विरोधकांनीदेखील राज्य सरकारला धारेवर धरल्याचे चित्र आहे. विजय वडेट्टीवार यांनी सरकारला व्यवस्थापन जमत नाही. अपयशी सरकार अशी ओळख सरकारची निर्माण झाल्याची टीका केली आहे. 


मुंबईच्या अवस्थेला पालिका अन् सरकार जबाबदार


विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुंबईच्या तिजोरीची लुट करणाऱ्या आणि डाका टाकणाऱ्यांमुळे ही परिस्थिती आहे. 300 मिमीमध्ये अशी परिस्थिती होत असेल तर काय? अनेक कामं राहिली होती. त्यांना कामे करता आली नाहीत. टक्केवारी आणि कमिशनखोरीत सरकार अडकलंय. मुंबईच्या अवस्थेला पालिका आणि सरकार जबाबदार आहे. सरकारच्या परतीचा प्रवास आता सुरु झालाय. सरकारला व्यवस्थापन जमत नाही, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. 


मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय?


मुंबईच्या पावसाचा फटका  सामान्य नागरिकांसह आमदार आणि मंत्र्यांनाही बसला आहे. राज्याचे मदत आणि आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना रेल्वे ट्रॅकवरुन चालण्याची वेळ आली. तसेच मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना देखील मुंबईच्या पावसाचा फटका बसला. यावरूनही विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय होणार?  हे सरकार काहीच करु शकत नाही. अपयशी सरकार अशी ओळख निर्माण झाली असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 


 






 


विजय वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा


दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी एक्स या सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांसाठी ग्रीन कार्पेट, मुंबईकरांसाठी जिकडे तिकडे चिखल! ग्रीन कार्पेट टाकून नालेसफाई कामाची पाहणी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पहिल्याच पावसाने त्यांच्या कामाची पावती दिली आहे. केंद्रापासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत यांचीच सत्ता आहे. तरी सुद्धा पहिल्याच पावसात मुंबई यांनी तुंबून दाखवली. 


आणखी वाचा


LIVE: मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाचा आदेश, दुसऱ्या सत्रातही शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार