मुंबई: लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या मतांचं विभाजन टाळलं तर मोदींचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे मविआकडून विरोधी पक्षातील मतांचे विभाजन टाळण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही या गोष्टीचा विचार करावा. जेणेकरुन विरोधकांमधील मतांमध्ये फूट पडणार नाहीत. अन्यथा उद्या या गोष्टीमुळे भाजपचा (BJP) विजय झाला आणि संविधान खरोखरच बदलले तर त्यासाठी जबाबदार कोण असेल, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचितने मविआसोबत येण्याच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करावा, अशी साद प्रकाश आंबेडकर यांना घातली. वंचित आणि एमआयएम सारख्या पक्षांमुळे विरोधकांची मतं विभागली जातात. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात नऊ ठिकाणी वंचितमुळे भाजपचे अतिरिक्त उमेदवार निवडून आले. मविआ आणि वंचितची चर्चा सुरु असताना आमची आनंदराज आंबेडकर यांच्याशीही चर्चा झाली होती. ते म्हणाले  होते की, अमरावतीची जागा मला द्या, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे. मात्र, त्यामुळे आंबेडकर कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला असता. त्यामुळे आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत गेलो नाही. आता प्रकाश आंबेडकर यांनी मतांचे विभाजन होऊन देऊ नये. नंतर संविधान बदलले तर त्याला जबाबदार कोण? आता प्रकाश आंबेडकर यांना जो निर्णय घ्यायचा आहे, तो घेऊ द्या. मात्र, आजही आमच्याकडून त्यांना सोबत येण्याचा प्रस्ताव आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.


साताऱ्यात काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास मी लढण्यासाठी तयार- पृथ्वीराज चव्हाण


सातारा लोकसभा मतदारसंघ आणि राज्यातील इतर लोकसभेच्या जागांमध्ये फरक आहे. साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. शरद पवार गटाकडून याठिकाणी कोण लढू शकेल, यासाठी चाचणी सुरु आहे. या जागेसंदर्भात काही लोक शरद पवार साहेबांना भेटले. पवार साहेब त्याबाबत निर्णय घेतील. यासंदर्भात आमच्यात थोडीफार चर्चा झाली आहे. मला माझ्या पक्षाकडून संधी मिळाली तर मी साताऱ्यातून लढायला तयार आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.


यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मविआच्या जागावाटपाबाबत भाष्य केले. राज्यातील 48 पैकी 45 जागांवर आमचे एकमत झाले आहे. त्यानुसार तिन्ही पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. सध्या एक-दोन जागांवर चर्चा सुरु आहे. भिवंडीच्या जागेवरील उमेदवार जाहीर झाला असेल तर त्याबाबत वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करुन निर्णय घेतला असेल. काँग्रेस आणि शिवसेनेत एक-दोन जागांबाबत मतभेद आहेत. मात्र, त्याबाबत लवकरच निर्णय होईल. सांगलीत आमचे स्थानिक कार्यकर्ते  त्या मतदारसंघात आक्रमकपणे विचार व्यक्त करत आहेत. मात्र, आमच्यात एक समन्वय समिती आहे. ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी चर्चा करुन प्रश्न सोडवत असते. त्यामुळेच काही निर्णय झाला तर तो समन्वय समितीचा निर्णय असेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.


आणखी वाचा


लोकसभा निवडणुकीतील वंचित फॅक्टरविषयी शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...