मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या मशाल गीतातील (Shiv Sena Mashal Song) 'जय भवानी' शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission) नोटीस (Notice पाठवली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या गीतातील भवानी शब्द काढणार नाही. जय भवानी, जय शिवाजी, ही आमची घोषणा आहे. घोषणेतील जय भवानी शब्द तुम्ही काढायला लावताय, उद्या तुम्ही जय शिवाजी काढायला लावाल, अशी हुकूमशाही पद्धत आम्ही स्वीकारणार नाही. आम्ही याच्या विरोधाच लढत आहोत, लढणार आहोत आणि कोणत्याही परिस्थितीत आमच्या गीतातून जय भवानी शब्द काढला जाणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


आधी मोदी-शाहांवर कारवाई करा


निवडणूक आयोगाने जर आमच्यावर कारवाई करण्याचं ठरवलं तर आधी मोदी आणि शाहांवर कारवाई करावी लागेल, मग ते आमच्या महाराष्ट्राच्या दैवतेचा अपमान कसं करतात, ते पाहू, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिलं आहे. 


मोदी-शाहांच्या धार्मिक प्रचारावर निशाणा 


मध्य प्रदेश निवडणुकीच्या वेळेस बजरंग बली यांच्या नावावर मत द्या, असं वक्तव्य मोदी यांनी केलं होत. याशिवाय, आम्हाला मत दिल्यास रामल्लाचं मोफत दर्शन देऊ, असं अमित शाह जाहीर सभेत बोलले होते. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मोदी आणि शाहांचे ते व्हिडीओ दाखवले. मोदी आणि शाहांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितल्याचं ठाकरेंनी सांगितलं आहे.


निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितलं


निवडणुकीत धर्माच्या मुद्द्यावर प्रचार करणे, नियमांच्या विरुद्ध आहे. असं असताना मोदी आणि शाह हिंदुत्वाचा प्रचार करत असतील, तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही, अशी विचारणा उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. यावर निवडणूक आयोगाने उत्तर न दिल्यास नियम बदलला आहे, असं आम्ही समजू आणि आम्ही देखील असा प्रचार केला, तर तुम्हाला कारवाई करता येणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


हा तुळजाभवानी मातेचा अपमान


तुळजाभवानी महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, ज्या तुळजाभवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना आर्शिवाद दिले. भवानी तलवारीचा प्रसंगही सर्वांच्या मनात कोरलेला आहे. 'जय भवानी, जय शिवाजी' ही घोषणा महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात आहे. आम्ही गाण्यातील जय भवानी शब्द काढणार नाही. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या कुलदेवतेचा अपमान केल्याचा आरोप केल्यास निवडणूक आयोगाकडे याचं उत्तर आहे काय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.




महत्त्वाच्या इतर बातम्या :


उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाची नोटीस धुडकावली, आधी मोदी-शाहांवर कारवाई करा; निवडणूक आयोगाला आव्हान