Uddhav Thackeray Dasara Melava मुंबई : राजधानी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरुन शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्यातील महायुती सरकावर व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरुन उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली. तसेच, यावेळी मोठी घोषणा केली असून राज्यात आपली सत्ता आल्यास प्रत्येक जिल्ह्यात आपण शिवाजी महाराजांची मंदिरं बांधणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच, शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, प्रभू श्रीरामांची जशी मंदिरं आहेत, तसेच आमच्या शिवरायांची (Shivaji maharaj) मंदिरं बांधण्यात येतील, अशी घोषणाच उद्धव ठाकरेंनी केली.  मुंबईतील शिवाजी पार्कवर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विचारांचं सोनं लुटण्याची प्रथा सुरू केली. त्यामुळे, मुंबईतील शिवसेनेच्या या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते. शिवसेनेत फुट पडल्यानंतर मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होतात. त्यापैकी, शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. 


राज्यात यंदा होत असलेल्या 4 दसरा मेळाव्यांकडे महाराष्ट्रातील जनेतेचं लक्ष लागून होतं. बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. तर, सावरगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा संपन्न झाला. आता,मुंबईतील शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर दोन्ही शिवसेनेचा दसरा मेळावा होत असून शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा होत आहे. येथील मेळाव्यात भाषण करताना शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महायुती सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनीही हिंदुत्त्व, शिवरायांचा पुतळा, संरसंघचालक, गोरक्षक यांसह विविध मुद्द्यांवरुन भाजप व महायुती सरकारला लक्ष्य केलं. 


राज्यातील प्रत्येक जिल्ह्या शिवरायांची मंदिरे बांधणार


शिवसेनेतील फुटीवर बोलताना, शेवटी आपलं कोणी नसतं, आपल्यासोबत जो उभा आहे तो आपला आणि आपल्याविरुद्ध लढायला जो उभा आहे तो आपला नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच शिकवण दिलीय, स्वराज्यावर चालून आला तो आपला शत्रू. स्वराज्यावर चालून आलेल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा वध केला नसता, तर आज आपण कुणीही नसतो. मात्र, भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला, 8 महिन्यात पुतळा कोसळला. मी वचन देतो, आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार, कारण शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. जसं राम    श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून आपण आज दसरा साजरा करतो. 


शिवाजी महाराज हे ईव्हीएम यंत्र नाही


छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली, राज्याभिषेक दिन आला की हार घालायचा आणि शिवाजी महाराज की जय असं म्हणायचं, एवढचं आपलं काम नाही. मोदीजी तुम्हाला आणि तुमच्या सरकारला शिवाजी महाराज हे केवळ मत मिळवण्याचं मंत्र वाटत असेल, पण  ते ईव्हीएम नाही. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. हे दैवत आपलं आहे, आपण नाही पुजायचं, मग कोणी पुजायचं. जो शिवाजी महाराजांच्या मंदिराला विरोध करेल, त्याला माझा महाराष्ट्र बघून घेईल, असेही उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून म्हटले. 


हेही वाचा


2 महिन्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री या व्यासपीठावर; संजय राऊतांचा CM पदावर दावा, मेळाव्यातून शिंदेंवर जोरदार हल्ला