Tejashwi Yadav Meets Sonia Gandhi: बिहारचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या बैठकीबाबत तेजस्वी यादव म्हणाले की, बिहारमधील (Bihar) सत्ताबदलानंतर आज पहिल्यांदाच आम्ही आमच्या घटक पक्षांच्या शीर्ष नेतृत्वाची भेट घेतली आहे. सत्तापरिवर्तन झाल्यानंतर काल दिल्लीत आलो. डी.राजा (D Raja), सीताराम येचुरी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सर्वांनी आमचे अभिनंदन केले. महागठबंधनाचे हे सरकार सुरळीत चालेल, हे जनतेचे सरकार आहे.


तेजस्वी यादव म्हणाले की, "नितीश कुमारांच्या निर्णयाने भाजपला चपराक बसली आहे. यासाठी मी मुख्यमंत्री आणि सोनिया गांधी यांचे आभार मानतो. मी माझे वडील लालू यादव यांचेही आभार मानतो की, ते आयुष्यभर गरिबांसाठी लढले. घाबरवणे हे भाजपचे काम आहे. ज्यांना भीती वाटते त्यांना ते घाबरवतात आणि जे विकले जातात त्यांना विकत घेतात. ईडी, सीबीआय, आयकर यांसारख्या संस्थांची स्थिती पोलिसांपेक्षाही वाईट झाली आहे. भाजप अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचा वापर करून लोकांना घाबरवत आहे.''


'भाजपला प्रादेशिक पक्षांना संपवायचे आहे'


भाजपवर आरोप करताना ते म्हणाले, "महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काय झाले ते आपण पाहू शकतो. प्रादेशिक पक्ष मागासवर्गीय आणि दलितांचे आहेत. या लोकांना या पक्षांना संपवायचे आहे." तेजस्वी यादव म्हणाले, "नितीश कुमार यांनी आमच्यावर आरोप केले आणि आम्ही त्यांच्यावर आरोप केले, पण ती सर्व घरची बाब होती. आता देशाच्या हितासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत. आम्ही समाजवादी लोक आहोत. खूप आधी नितीश कुमार मला त्यांच्या भावासारख्या मित्राचा मुलगा म्हणायचे. पूर्वीही त्यांनी मला बाबू म्हटले आहे. त्यांनी मला नेहमी आदराने संबोधले''


नोकरी देण्यावर काय म्हणाले तेजस्वी यादव?


तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, "केंद्रात जंगलराज आहे, तिथे भाजपचे खासदार एक शब्दही बोलत नाहीत. आम्ही भाजपच्या लोकांना वठणीवर आणले आहे. मुस्लिमांचा मतदानाचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. रोजगाराच्या मुद्द्यावर आम्ही त्यांना आणले आहे. आठ वर्षात सोळा कोटी नोकऱ्यांचे काय झाले? दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे ते म्हणाले होते.'' एका महिन्यात सरकारी नोकऱ्या देणारे बिहार हे सर्वात मोठे राज्य असेल, असा दावाही यावेळी  तेजस्वी यादव यांनी केला.