पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत शरद पवार गट विरुद्ध अजितदादा गटात होणार, हे स्पष्ट झाल्यानंतर येथील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. बारामतीचा गड कोणत्याही परिस्थितीत राखायचाच, या इर्षेने शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही सध्या प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. बारामतीत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या 'दादा' स्टाईलमध्ये राजकारण करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बारामती मतदारसंघातील शरद पवार (Sharad Pawar) समर्थकांवर दबाव आणण्याचा प्रकार सुरु असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गुरुवारी लोणावळ्यात अजितदादा गटाच्या सुनील अण्णा शेळके यांना 'मर्यादेत राहा, नाहीतर माझं नाव शरद पवार आहे, हे लक्षात ठेवा', असा सज्जड इशारा दिला होता. त्यानंतर आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही इंदापूरमध्ये सुरु असलेल्या राजकीय दादागिरीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर अजितदादा गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने आक्षेपार्ह भाषेत टीका करत त्यांना धमकी दिली होती. याच मुद्द्यावरुन सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला लक्ष्य केले. 


सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथील सभेत अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांना रोखठोक भाषेत इशारा दिला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागली आहे. लोकशाही पद्धतीने नव्हे तर दडपशाही पद्धतीने राजकारण होत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या ज्या व्यक्तीने आयुष्य राजकारणात घालवले, त्या माणसाला धमकी मिळणे, हे दुर्दैवी आहे. असे राजकारण कधीच झाले नाही. गृहमंत्री असताना भीती राहिली नाही. हर्षवर्धन पाटील हे सन्मानीय व्यक्ती असून बारामती मतदारसंघात कुणालाही धमकी दिली तर तो प्रकार सहन केला जाणार नाही. अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लावली. आम्ही सर्व एकत्र असताना कुणीही कुणाला धमकी दिली नाही. बारामती मतदारसंघात पहिल्यांदा धमकी दिल्याचा प्रकार मी ऐकत आहे.मी बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी आहे. त्यामुळे या मतदारसंघातील लोकांची जबाबदारी माझी आहे. माझ्या मतदारसंघात कुणालाही धमक्या दिल्या जात असतील तर सुप्रिया सुळे ताकदीने उतरले, असे त्यांनी म्हटले.


लग्नाच्या मांडवात सुप्रिया सुळे-हर्षवर्धन पाटलांची भेट


काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील एका लग्नसमारंभात हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली होती. यावेळी या दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसून गप्पा मारल्या. हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीमुळे बारामती मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.


आणखी वाचा


'अजित पवारांना पक्षात हवी ती पदं दिली, मात्र त्यांनी...'; माझा व्हिजनमध्ये नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?