Neelam Gorhe: एकीकडे ठाकरे गटातील नेते तुटून पडले दुसरीकडे शिंदे गटातील नेतेही नीलम गोऱ्हेंवर नाराज, म्हणाले...
Neelam Gorhe: नीलम गोऱ्हे यांना उद्धव ठाकरे यांनी चारवेळा आमदार केलं. पण ती विश्वासघातकी बाई आहे. तिने जाताना ताटात घाण केली, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

मुंबई: उद्धव ठाकरे यांना दोन मर्सिडीज दिल्या की ते एक पद देतात, असे वक्तव्य केल्यामुळे विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख नेते त्यांच्यावर अक्षरश: तुटून पडले होते. एकीकडे जहरी टीका आणि अब्रुनुकसानीचा दावा, अशा दुहेरी कात्रीत नीलम गोऱ्हे सापडल्या आहेत. अशात आता शिंदे गटातील सहकारीही त्यांच्या मदतीला पुढे येत नसल्याची माहिती समोर आली आहे. किंबहुना शिंदे गटात नीलम गोऱ्हे यांच्याविषयी नाराजी पसरली आहे.
नीलम गोऱ्हे यांच्या विधानाबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांकडून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशाप्रकारचं वक्तव्य करण्याची गरज नव्हती, असे पक्षातील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. गरज नसताना आणि अवेळी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला डॅमेज झाल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः त्यावर समोर येऊन बोलावं, अशी भूमिका शिंदे गटातील या नेत्यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे आता नीलम गोऱ्हे प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाच्या संजय राऊत, सुषमा अंधारे, अंबादास दानवे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात टीकेची राळ उठवली होती. मात्र, संजय शिरसाट आणि प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा अपवाद वगळता शिंदे गटातून नीलम गोऱ्हे यांच्या बचावासाठी फार कोणी पुढे आले नव्हते. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनीही नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
शरद पवार काय म्हणाले?
मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या परिसंवादात नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यावेळी नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत स्फोटक वक्तव्य केले होते. ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो. कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना (शिंदेंना) दिलं होतं. (उबाठांच्या शिवसेनेमध्ये) दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा सनसनाटी आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला होता.
आणखी वाचा
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ





















