Sharad Pawar, Pune : "आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं पुण्यामध्ये? मी देशाच्या कामासाठी दिल्लीला जातो पार्लमेंटचा सभासद आहे म्हणून दिल्लीला जातो. महाराष्ट्राची वर्तमानपत्र मागून घेतो, टीव्ही लावतो काय बघायला मिळतं? पुण्याची चौकशी केली तर लोक सांगतात पुण्याचे वैशिष्ट्य काय? कोयता गँग. कोयता गँग विद्येचे माहेरघर हे पुणं. टेल्को सारखा कारखाना, या पुण्यात बजाज सारखा कारखाना हे पुण्याचे वैशिष्ट्य, किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचे वैशिष्ट्य आणि आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचे वैशिष्ट्य काय केले?" असा सवाल करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी शुक्रवारी (दि.28) पुण्याच्या खराडी येथील सभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शरद पवार बोलत होते. 


पुण्याची नवी पिढी ही उध्वस्त होणार या प्रकारचे चित्र


शरद पवार म्हणाले, कोयता गँग आता भाषणामध्ये कोणी सांगितलं जर अलीकडच्या काळामध्ये नवी पिढी काय करतात मला माहित नाही. कसल्या तरी गोळ्या असतात ते खाल्लं तर एकदम चंद्रावर जातो आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुण्याच्या भागांमध्ये व्हायला लागला आहे. आजचे राज्यकर्ते कोयता गँग असो, ड्रग्ज व्यवहार असो याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करत आहेत. यामुळे पुणे आणि पुण्याची नवी पिढी ही उध्वस्त होणार या प्रकारचे चित्र या ठिकाणी दिसते. आज हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.


अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकिटावर निवडून आला? पवारांची सुनील टिंगरेंवर टीका 


पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मध्यंतरी वाचलं एक आमदार अशा कामांमध्ये वेगळ्या पद्धतीने लोकांना मदत करतो. आता मी येताना बघितलं मोठे मोठे बोर्ड होते. आमचा दमदार आमदार काय दमदार आहे? चौकशी केली की हा आमदार दमदार आहे म्हणून काय भानगड काय? नाव काय त्याचं? टिंगरे. अरे बाबा तू सांगतो तू कुणाच्या तिकिटावर निवडून आला? त्या वेळेला तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? त्या वेळेला हा पक्ष कोणी काढला? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही कोणी केली? सबंध हिंदुस्थानला माहित आहे त्या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली काम करावं अशी अपेक्षा केली. तू सोडून गेला ठीक आहे तुझा काय बंदोबस्त करायचा? हे लोक करतील त्याची चिंता त्या ठिकाणी नाही. पण निदान चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देऊ नको. प्रचंड मोठा अपघात झाला. दोन काही तरुण मुलं एका इम्पोर्टेड गाडीतून चालली काय आणि समोरून स्कूटर वर दोन तरुण मुलगा आणि मुलगी जात असताना त्यांना उडवलं काय जागच्या जागेवर त्यांची हत्या काय होते? उद्ध्वस्त होतात आणि अशा वेळेला जे जखमी झाले त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो. याच्यासाठी मतं मागितली होती? असा सवालही शरद पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांना केला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


शेतकऱ्याची सटकली... महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास ऑफिसमध्ये मारहाण; व्हिडिओ तुफान व्हायरल