Sharad Pawar NCP, Pune : बरोबर पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) एकामागोमाग एक दिग्गज नेते पक्ष सोडून भाजपमध्ये सहभागी होऊ लागल्यानं राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता पाच वर्षांनंतर शरद पवारांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असल्याचं दिसून येतंय . मागील चार दिवसांत शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यभरातील विविध मतदारसंघातील बाराशे ऐंशी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यात. शरद पवारांच्या (Sharad Pawar)  राजकारणासाठी गेली पाच वर्ष ही रोलर कोस्टरसारखी ठरलीत. त्याचा हा आढावा. 


1280 उमेदवारांच्या मुलाखती शरद स्वतः घेतल्यात


राष्ट्रवादी पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी शरद पवारांनी गेल्या पाच वर्षांत बदलून टाकलेल्या राजकारणाची निदर्शक आहे. आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्यातील वेगवगेळ्या विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडं 1680 अर्ज आलेत . त्यापैकी विदर्भ , मराठवाडा , पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील 1280 उमेदवारांच्या मुलाखती शरद स्वतः घेतल्यात. मुंबई आणि कोकण विभागातील उरलेल्या चारशे इच्छुकांच्या मुलाखती शरद पवार मुंबईत घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त स्ट्राईक रेट नोंदवत आठ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या  पक्षाकडं त्यामुळं इच्छुकांची गर्दी वाढताना दिसतेय. 


अजित पवार सोडून गेल्यानंतर लोकसभेत 8 जागा जिंकल्या अन् सुगीचे दिवस आले


मात्र बरोबर पाच वर्षांपूर्वी याच्या उलट परिस्थिती होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या प्रचंड बहुमतानंतर त्यावेळच्या राष्ट्रवादीला भगदाडं पडायला लागली होती. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले , त्यांचे बंधू शिवेंद्रराजे भोसले , अकलूजचे  मोहिते पाटील , धाराशिवचे राणा जगजितसिंह पाटील , निरंजन डावखरे , बीडचे सुरेश धस , चित्रा वाघ अशा एक ना अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचा रस्ता धरला होता. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेससमोर अस्तित्वाची लढाई असल्याचं बोललं गेलं. पण निवडणुकीनंतर भाजप आणि उद्धव ठाकरेंमधील बेबनावाचा उपयोग करत शरद पवारांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात मुख्य भूमिका निभावली आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती थांबली. पण अडीच वर्षांनंतर स्वतः अजित पवारांनी शरद पवारांकडून पक्षच काढून घेतला. प्रफुल पटेल , छगन भुजबळ , सुनील तटकरे यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते शरद पवारांना सोडून गेले.  पण त्यानंतर देखील शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व पक्षांपेक्षा सर्वात बेस्ट स्ट्राईक रेट नोंदवून आठ जागा जिंकल्या आणि पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस आले.


पवारांनी सोडून जाणाऱ्या नेत्यांच्या स्थानिक विरोधकांना आपलंस केलं


खरं तर शरद पवारांनी गेल्या साठ वर्षांच्या राजकारणात अनेक चढ उतार पाहिलेत. त्यांचे अनेक सहकारी त्यांची साथ सोडून गेले . पण पवारांनी सोडून जाणाऱ्या नेत्यांच्या स्थानिक विरोधकांना आपलंस करून त्यांना बळ दिलं. अनेकांनी प्रयत्न करून देखील  शरद पवार राजकारणातून संपले नाहीत ते यामुळं . आता देखील पक्षातील अपवाद वगळता सर्व बडे नेते सोडून गेल्यानं निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा उठवत शरद पवार नव्या फळीची भरती करतायत. त्यामुळं पाच वर्षांपूर्वी जो पक्ष राहील की जाईल असं वाटत होतं तो इच्छुकांची गर्दी खेचताना दिसतोय. 


बरोबर पाच वर्षांपूर्वी शरद पवारांचं पंचावन्न - साठ वर्षांचं महाराष्ट्रातील राजकारण संपल्याची चर्चा सुरु झाली. एकामागोमाग एक सरदार  निवडणूक तोंडावर असताना मैदान सोडू लागले होते. पण रिकाम्या झालेल्या या जागा नव्या पिढीला संधी देऊन भरून काढता येतात हा शरद पवारांचा जुना अनुभव असल्यानं त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि चित्रं बदललं. अजित पवारांनी पक्ष काबीज केल्यावर तर आणखी मोठी पोकळी निर्माण झाली आणि ती पाहून शरद पवारांच्या पक्षाकडं आणखी गर्दी वाढताना दिसतेय. पवारांचं राजकारण आऊटडेटेड का होत नाही या प्रश्नांच उत्तर त्यांच्या पोकळी भरून काढण्याच्या या राजकारणात दडलंय.   


इतर महत्त्वाच्या बातम्या 


आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल