Sharad Pawar On Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप (BJP) यांच्या जवळीच्या चर्चा केवळ तुमच्या मनात आहेत, आमच्या कुणाच्याही मनात नाही. या चर्चांना अजिबात महत्व नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सध्याच्या राजकीय चर्चांवर भाष्य केलं. ते पुण्यात (Pune) बोलत होते.  अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या राजकीय चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवार जी भूमिका घेतील ती मान्य असल्याचं म्हटलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं होतं. 


शरद पवार म्हणाले, "अजित पवारांबाबत जी चर्चा सुरु आहे, ती केवळ माध्यमांच्या मनात आहेत, आमच्या कुणाच्याही मनात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व सहकारी पक्षाला शक्तिशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. अजित पवारांनी कोणतीही बैठक बोलावलेली नाही. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे सध्या त्यांच्या भागात आहेत. दुसरे नेते अजित पवार हे बाकीच्यांना मार्गदर्शन करत आहेत. मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही."


अजित पवारांनी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त


दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली होती. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही वृत्तात म्हटलं आहे. शिवाय यंदा शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असंही द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. 2019 साली अजित पवार यांचं बंड शरद पवार यांच्यामुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाही. 


नव्या समीकरणाच्या केवळ चर्चा : अजित पवार


अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. "नव्या समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत. यात काही तथ्या नाही. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे," असं अजित पवार म्हणाले.


दरम्यान, गेल्या आठवड्यातही अजित पवार यांनी काही कार्यक्रम रद्द केले होते. तेव्हापासून अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. रोखठोकमध्येही खुद्द शरद पवार यांच्या वक्तव्याचा आधार घेत पक्षांतरासाठी दबाव आहे, असं स्पष्टपणे लिहिण्यात आलं होतं. आता अजित पवार यांनी नव्या समीकरणाच्या चर्चा फेटाळल्या आहेत.