Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Nashik Lok Sabha Constituency) शांतिगिरी महाराज (Shantigiri Maharaj) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. काल (रविवारी) रात्री उशिरा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बैठकीच्या वेळी शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) उपस्थित होते. 


नाशिक लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. विद्यमान खासदार हेंमत गोडसे (Hemant Godse) तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याचा तयारीत आहेत. मात्र शिवसेनेसह भाजपमधूनही (BJP) हेमंत गोडसे यांच्या कामाच्या पद्धतीवर नाराजी  वाढत आहे, त्यामुळे हेंमत गोडसे यांना पर्याय शोधला जात आहे. नाशिकची (Nashik News) जागा शिवसेनेला सुटली तर शांतिगिरी महाराज उमेदवार असू शकतात, त्यांना भाजपचाही पाठिंबा असू शकतो, अशी सध्या नाशिकमध्ये चर्चा आहे. 


प्राथमिक चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शांतिगिरी महाराज यांच्यात झाल्यानंतर पुढील दोन तीन दिवसांत पुन्हा बैठक होणार आहे. दरम्यान, शांतिगिरी महाराज यांच्याकडून प्रचाराला सुरवात झाली असून गाव पातळीवर भेटीगाठी घेत आहेत. आपला लाखोंचा भक्त परिवार असल्याचा दावा शांतिगिरी महाराज यांच्याकडून केला जात आहे. धार्मिक नगरी, कुंभनगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. विद्यमान खासदार किंवा दोन्ही पक्षांतील इच्छुकांना डावलण्यासाठी संत महात्म्यांना तिकीट दिल्यानं फारसा रोष ओढवणार नाही. या भावनेतून शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.


शांतिगिरी महाराजांमुळे माझं तिकीट कापलं जाणार नाही : हेमंत गोडसे


शांतिगिरी महाराजांमुळे माझं तिकीट कापलं जाणार नाही, असा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. हेमंत गोडसे म्हणाले की, जे इच्छुक उमेदवार असतात, ते प्रत्येक ठिकाणी भेटी घेत असतात. नीट विचार करून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असा विश्वासही यावेळी बोलताना हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या 10 वर्षांपासून नाशिक लोकसभेचं नेतृत्व मी करतोय. संघटना बांधणी, विकासकामं केलेली आहेत. मागे आम्ही शिवसेनेच्या 18 खासदारांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली होती. या 18 जागा परत मिळवण्याचा आग्रह आहे, या 18 जागा मिळतील असा विश्वासही आम्हाला आहे. आमचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आहे. नवे 5 उमेदवारही शिवसेनेत येतील. आता रवींद्र वायकर आले, अजून काही धक्के मिळणार आहेत. 


शांतीगिरीजी महाराजांचा नाशिकमध्ये दांडगा संपर्क


शांतीगिरीजी महाराजांचा छत्रपती संभाजीनगरसह नाशिकमध्ये मोठा भक्तपरिवार आहे. नुकतेच महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथे धार्मिक अनुष्ठान पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने भक्तपरिवार उपस्थित होता. नाशिक (Nashik) जिल्ह्यात बाबांचा भक्तपरिवार असल्याने तसेच त्यांचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील असल्याने त्यांचा नाशिकमध्ये दांडगा संपर्क आहे. 


कोण आहेत शांतीगिरी महाराज?


शांतीगिरी महाराज हे जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी आहेत. लाखोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार आहे. भजन, प्रवचन, अनुष्ठान, सत्संगच्या माध्यमातून धार्मिक कार्यात पुढाकार ते घेतात. देशभरात त्यांचे 115 आश्रम आहेत, 7 गुरुकुल देखील ते चालवितात. अनुष्ठानच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांची मौनीगिरी महाराज अशीही ओळख आहे. या आधी त्यांनी तब्बल 12 वर्ष मौन पाळले होते. आताही अनुष्ठान काळात ते मौन धारण करतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मोठी बातमी : अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय, विजय शिवतारेंनी दंड थोपटले