Sanjay Raut on Mahayuti : "सूर्यकुमार यादव तू घेतलेला कॅच कोणी विसरु शकणार नाही. तसंच दोन वर्षांपूर्वी आमच्या 50 जणांच्या टीमने काढलेली विकेटही कोणी विसरु शकणार नाही", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. महाराष्ट्रातील विश्वविजेत्या  खेळाडूंचा विधानभवनात शुक्रवारी सत्कार करण्यात आला होता. यावेळी शिंदेंनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 


काय म्हणाले संजय राऊत? 


तुमच्या क्लीनबोल्डची वेळ आता आलेली आहे. तोही क्षण तुम्ही लक्षात ठेवा. तुमचे तिन्ही स्टंप उडवणार आहोत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे तुमचे तिन्ही स्टंप आता उडणार आहेत, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना दिलं आहे. 


आमची ताकद किती हे दंडाची बेडकी फुगून दाखवत आहेत


संजय राऊत म्हणाले, आमची ताकद किती हे दंडाची बेडकी फुगून दाखवत आहेत. या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारा संदर्भात कारवाई करा. वायकर हे घाबरून पळून गेलेले आहेत वायकरांना आता क्लीन चीट दिली. या सरकारमध्ये दुसरं काही होऊ शकत नाही. त्यांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना आपल्या पक्षात घेतले. हे तुम्ही मान्य करा.


आमच्यावरचे सुद्धा गुन्हे मागे घ्या ना, नवाब मलिक यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या


आमच्यासह सर्वांवरती तुम्ही खोटे खटले, खोटे गुन्हे दाखल केले. आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाहीत, पण ज्यांचं काळीज उंदराचं आहे असे अनेक लोक पळून गेले. अजित पवार, मुख्यमंत्री यांच्याकडील आमदार, आमच्याकडील मंत्री भीतीपोटी पळून गेले त्यातीलच एक वायकर आहेत. आमच्यावरचे सुद्धा गुन्हे मागे घ्या ना, नवाब मलिक यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या. प्रफुल पटेलांची  150 कोटींची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केलीत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. 


वायकरांना आमच्या शिवसेनेतून पळून जायला भाग पाडले


अनेक गुन्हे राजकीय दबावातून आणि गैरसमजातून त्यांनी दाखल केले आणि लोकांना तुरुंगात जावं लागलं. आर्थिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत ज्यांनी गैरसमजातून गुन्हे दाखल केले, जो मनस्ताप दिलेला आहे. त्यामुळे वायकरांना आमच्या शिवसेनेतून पळून जायला भाग पाडले. त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. 




इतर महत्वाच्या बातम्या


Manoj Jarange Patil : मराठ्यांना कमजोर समजू नका, बीड जिल्ह्यातील मराठ्यांवरील त्रास थांबवा; आम्ही एकटेच 50-55 टक्के : मनोज जरांगे पाटील