Rohini Khadse on Gulabrao Patil : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणायचे की, महिलांनी पर्समध्ये लिपस्टिकसह मिरचीची पूड आणि रामपुरी चाकू ठेवला पाहिजे. त्यावेळी विरोधक बाळासाहेबांवर टीका करायचे. परंतु आताच्या घटना बघितल्या तर महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहिलं पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगावात महिला दिनानिमित्त (Internation Women's Day 2025) आयोजित कार्यक्रमात केले होते. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी गुलाबराव पाटील यांना टोला लगावलाय. 


रोहिणी खडसे म्हणाल्या की, गुलाबराव पाटील आपण काल एक कार्यक्रमात महिलांनी सुरक्षिततेसाठी स्वतःच्या पर्समध्ये मिरचीची पूड आणि चाकू ठेवावा असे वक्तव्य केले होते. सगळ्यात पहिले तर महिलांच्या सन्मानाबाबत आपण बोलूच नये. कारण या आधीच्या एका वक्तव्यामध्ये आपल्याला महिलांबाबत किती आदर आहे हे आपण दाखवून दिले आहे. आपल्या मतदारसंघातल्या रस्त्यांची तुलना ही हेमा मालिनी यांच्या गालांशी आपण केली आहे. त्यामुळे महिलांच्या प्रति आपल्याला किती आदर आहे हे आम्ही आधीच बघितले आहे, असे त्यांनी म्हटले. 


तुमच्या प्रवृत्तीचा निषेध : रोहिणी खडसे


रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, आपल्याला असे म्हणायचे आहे का महिलांनी सुरक्षिततेसाठी तुम्हाला हवं ते तुम्ही करून घ्या, आम्ही सरकार म्हणून तुमच्या संरक्षणासाठी काहीही करू शकत नाही. सरकारचे महिलांना सुरक्षित वातावरण देण्याचे अपयश आपण मान्य केले आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आम्ही महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी लढतोय, त्यांच्यासाठी संघर्ष करतोय, तुम्ही त्यांच्यासाठी संघर्ष तर दूर त्यांच्यासाठी आवाज उठवण्याचा तर दूर तुम्ही तुमचं काय ते बघा असे म्हणून तुम्ही मोकळे झालात. तुमच्या या प्रवृत्तीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. तुमच्या निर्लज्ज सरकारचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो, असा हल्लाबोल रोहिणी खडसे यांनी केला. 


नेमकं काय म्हणाले होते गुलाबराव पाटील? 


महिलादिनाच्या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाची आठवण करून देत गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते की, महिलांच्या सुरक्षेवर बोलताना महिलांनी आपल्या पर्समध्ये लाली पावडर न ठेवता मिरचीची पूड व चाकू ठेवायला हवा, असे आवाहन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. यावरुन त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र, महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता आता खरोखर बाळासाहेब म्हणाले होते तसे करण्याची वेळ महिलांवर आली आहे. आज महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता महिलांनी वाघीण झालं पाहिजे. आजची नारी अबला न राहता ती सबला झाली पाहिजे. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. महिलांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांनी आत्महत्या न करता त्यावर उपाय शोधावा टोकाची भूमिका घेऊ नये, असे त्यांनी म्हटले होते.



आणखी वाचा 


Raj Thackeray: अंधश्रद्धेतून जरा बाहेर या, डोकी हलवा; कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरें कडून खिल्ली, म्हणाले....