Republican Party Of India A Group Announced List : मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष (ए) (Republican Party of India (A)) लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरला असून पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha Election) उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे (Deepak Nikalje) यांनी महाराष्ट्रातील 9 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची आज घोषणा केली. यामध्ये नागपूर (Nagpur) आणि विदर्भातील (Vidarbha) 9 उमेदवारांचा समावेश आहे. 


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षानं (आंबेडकर) लोकसभेच्या रिंगणात आपपले उमेदवार उतरवले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी महाराष्ट्रातील 9 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची आज घोषणा केली आहे. यामध्ये नागपूरमधून रेखा गोगले, अमरावती कैलाश मोरे, रामटेक अमोल वानखेडे, भंडारा-गोंदिया कुवरलाल रामटेके, बुलढाणा संतोष इंगळे, वाशिम-यवतमाळ गणेश चंद्रशेखर, हिंगोलीमधून प्रकाश रणवे, वर्धा लोकसभा मतदारसंघातून आर.एस.वानखेडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 




दीपक निकाळजे कोण? 


दीपक निकाळजे हे गेल्या 20 वर्षापासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. आधी ते रिपाइं नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यानंतर त्यांनी आठवले यांच्यापासून वेगळं होत स्वत:चा गट स्थापन केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष (आंबेडकर) दीपक निकाळजे यांचा गट म्हणून ओळखला जातो. 


रामदास आठवलेंचा पक्ष किती जागांवर लोकसभा लढवणार? 


रामदास आठवलेंचा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं अद्याप किती जागा लढवणार याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. काही दिवसांपूर्वी बोलताना रामदास आठवलेंनी महाराष्ट्रात शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा लोकसभेसाठी आम्हाला मिळणं गरजेचं आहे, अशी इच्छा महायुतीकडे जाहीरपणे व्यक्त केली होती. शिर्डीची जागा दिली नाही तर बदल्यात अन्य काही देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असंही ते म्हणाले होते. आम्ही कितीही झालं, तरी इंडिया आघाडीत जाणार नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार सत्तेत विकास करण्यासाठी राहणं पसंत करू, असं रामदास आठवले म्हणाले होते. आरपीआय पक्ष  छोटा असला तरी महाराष्ट्रात 2 जागा आम्हाला मिळणं अपेक्षित आहे. राज ठाकरेंच्या निर्णयावर आम्हाला विश्वास नाही. आमच्या युतीत राज ठाकरे येणं अनपेक्षित, असंही रामदास आठवले म्हणालेले. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे, असं म्हणत आठवलेंनी थेट उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता.