रत्नागिरी : 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उदय सामंत (Uday Samant) रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असतील पण शिवसेना त्यांचा पराभव करेल ,असं मोठं विधान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केले आहे. उदय सामंत हे कुणाचेही होऊ शकत नाहीत त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप राजन साळवींनी केला आहे. स्थानिकांचा विरोध असताना देखील उदय सामंत यांना 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश दिला गेला.  सामंत यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने मेहनत घेतली होती, असं देखील राजन साळवी यांनी म्हटलं आहे.


किरण सामंत यांच्या रूपाने भविष्यात प्रत्येकाला आपला वाटणारा आणि घरातला आमदार मिळेल अशी टीका उदय सामंत यांनी राजन साळवी यांचं नाव न घेता केली होती. राजन साळीव यांनी त्याला आता उत्तर दिले आहे. मी एकाच पक्षात मागची 40 वर्ष काम करत आहे. नगरसेवक, जिल्हाप्रमुख आणि आमदार अशी विविध पद मी भूषवली आहेत. सर्वांच्या सुखदुःखात मी नेहमीच सहभागी झालो आहे. अगदी बारसं आणि पाचवीला देखील मी गेलो आहे. काही वर्षांपूर्वी रत्नागिरीतील हातखंबा येथे एक अपघात झाला होता. त्या सर्वांना घेऊन आम्ही जिल्हा रुग्णालयामध्ये आलो. त्यावेळी एक लहान बाळ दुधासाठी रडत होतं. अशावेळी माझ्या वहिनीने त्या बाळाला आपल्या अंगावरच दूध दिलं होतं, आम्ही अशी माणसं आहोत, असं प्रत्युत्तर देखील राजन साळवी यांनी सामंत बंधू यांना दिले आहे.


राजापूर इथं मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलला मंजुरी मिळाल्याचं सामंत सांगतात. पण त्यासाठी जागा ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिली गेली होती. मात्र, हॉस्पिटलच्या इमारतीसाठी अजूनही एक रुपया देखील मंजूर नाही. केवळ निवडणुकीवर डोळा ठेवून सर्व काही केले जात असल्याचे देखील राजन साळवी यांनी म्हटलं आहे. मागच्या काही दिवसांपासून याच मुद्द्यावरून कोकणात ठाकरे आणि शिंदे यांचे लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्ते आरोप - प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले.


दरम्यान, उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता.  ते सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असून राज्याचे उद्योगमंत्री म्हणून काम पाहत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये उदय सामंत यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्रिपद होतं.


इतर बातम्या :


मोठी बातमी! सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली; आता पुण्यात महत्त्वाची जबाबदारी


Vidhansabha Election : भाजपचे आजी-माजी आमदार आमने-सामने ; लाडक्या बहि‍णींना कुणी साड्या वाटल्या, कुणी सायकली