Rahul Gandhi Notice Bungalow: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. संसदेचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर लोकसभेच्या सभागृह समितीने ही नोटीस जारी केली आहे. राहुल गांधी 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहतात. राहुल गांधी यांना 22 एप्रिलपर्यंत त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे. नोटीसनुसार, अपात्रतेनंतर एक महिन्याच्या आत राहुल गांधी यांना त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे करावे लागणार आहे.


गुजरातमधील सुरतच्या एका न्यायालयाने गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी आडनावा'शी संबंधित केलेल्या टिप्पणीबद्दल 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यातच शुक्रवारी राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले.


संसद सदस्यत्व रद्द 


लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, त्यांचा अपात्रतेचा आदेश 23 मार्चपासून लागू होईल. अधिसूचनेत म्हटले आहे की, त्यांना (राहुल गांधी) संविधानाच्या कलम 102 (1) आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8 अंतर्गत अपात्र ठरवण्यात आले आहे.


सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काय म्हणाले होते राहुल गांधी? 


लोकसभेतून अपात्र ठरल्याच्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी म्हटले की, ''मी संसद सदस्य राहू किंवा नाही, मला तुरुंगात टाकले तरी लोकशाहीसाठी लढत राहणार. आपण घाबरत नाही आणि माफी मागणार नाही. कारण माझे नाव गांधी आहे, सावरकर नाही आणि गांधी माफी मागत नाहीत.'' अदानी समूहाशी संबंधित प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. खरा प्रश्न हा आहे की, अदानी समूहात 20 हजार कोटी रुपये गुंतवले गेले आहेत, तो पैसा कोणाचा आहे?, असं ते म्हणाले आहेत.


दरम्यान, संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यान आज काँग्रेस पक्षाचे खासदार काळ्या पोशाखात राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याने निषेध नोंदवण्यासाठी पोहोचले. काँग्रेसच्या खासदारांशिवाय इतर काही विरोधी नेत्यांनीही काळे कपडे घालून निषेध व्यक्त केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत भाजपवर शाब्दिक हल्ला चढवताना सत्य लोकांसमोर यावे अशी आमची इच्छा आहे, असं म्हटलं. खरगे म्हणाले की, अवघ्या अडीच वर्षांत अदानीची संपत्ती कशी वाढली, यामागे काय कारण असू शकते, असा प्रश्न त्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.