Sandeep Kshirsagar on Jaydutt Kshirsagar: बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील (Beed Assembly Constituency) शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी आज (बुधवारी) बीडमध्ये (Beed News) विविध प्रश्न संदर्भात पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदे दरम्यान काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेट निशाणा साधला आहे.  


निवडणुका जाहीर झाल्यावरच ते अॅक्टिव्ह होतात आणि ते निवडणूक आल्यानंतरच ते प्रकट होतात. अशा शब्दांत आमदार संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर बोलताना म्हणाले की, आमचे काका निवडणुका आल्या की, सक्रिय होतात. आता ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या अफवा आहेत, परंतु मी एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि आमदार म्हणून हे जबाबदारीनं सांगू शकतो की, या निव्वळ अफवा आहेत, असा कुठलाही प्रकार नसल्याचं म्हटलं आहे.   


काका जयदत्त क्षीरसागर निवडणुका आल्या की, सक्रिय होतात. परंतु, पडल्यानंतर ते चांगल्या पद्धतीनं काम करतात, असा टोला देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना लगावला आहे. बीडमध्ये केवळ श्रेयवादाचं राजकारण सुरू असून प्रत्यक्षात काम मात्र होत नाही, हे दुर्दैव. आम्ही ज्या कामाचा पाठपुरावा करतो, त्याला अडवण्याचं आणि भेदभावाचं राजकारण केलं जात आहे. या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितलेली आहे, असं देखील संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.