''राज्य विभागाची गोपनीय माहिती बाहेत गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या याप्रकरणी 5 अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्यांचा संबंध आहे, त्यांचा जबाब घेणं गरजेच आहे. देवेंद्र फडणवीस यांना 6 वेळा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसचा अर्थ समनस असा होत नाही. फडणवीस यांनी काही बदल्यांबाबतची माहिती समोर आणली, त्याबाबत माहिती घ्यायची होती. त्यांना याआधी देखील दोनदा प्रश्नावली पाठवण्यात आली आहे.'' असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी सुरु आहे. याविरोधात राज्यभरात भाजप कार्यकर्ते आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

      


दिलीप वळसे पाटील, म्हणाले आहेत की, ''याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना पाच ते सहा वेळा नोटीस देण्यात आली होती. त्यावेळीही त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले नव्हते. तर त्यांच्याकडे प्रश्नावली पाठवली होती. मात्र त्यांच्याकडून त्या प्रश्नावलीचे उत्तर आले नाही. म्हणून आज पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा जवाब नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणती माहिती द्यायची याचा संपूर्ण अधिकार फडणवीसांना आहे '' ते म्हणाले आहेत की, पोलीस आपलं काम करत असून यात गैर काही नाही. 


या प्रकरणाचं भाजप राजकीय भांडवल करत आहे - पाटील   


फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीस नंतर भाजप राज्यभर आंदोलन करत आहे. यावरच बोलताना दिलप वळसे पाटील म्हणाले आहेत की, एखाद्या प्रश्नाचं राजकीय भांडवल करणं, हे तर राजकारणात चालूच असतं. त्याच प्रमाणे भाजप ते करत आहे. दरम्यान, बीकेसी सायबर पोलिसांकडून फडणवीस यांची चौकशी पूर्ण झाली आहे. तब्बल दोन तास ही चौकशी सुरू होती. यानंतर आता फडणवीस माध्यमांशी बोलतील का? याबाबत बोलताना ते कोणती माहिती देतील, हे पाहावं लागेल.


महत्त्वाच्या बातम्या: