गुहागर: भास्कर जाधव यांनी आमच्या शेपटावर पाय ठेवला आहे. मी या जन्मात ही गोष्ट विसरणार नाही. मी आता तुला सोडणार नाही, अशा आक्रमक शब्दांत निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भास्कर जाधव यांना लक्ष्य केले. ते शुक्रवारी गुहागर येथील जाहीर सभेत बोलत होते. या सभेपूर्वी चिपळूणमधून येताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यालयासमोर ठाकरे गट आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांचा राडा झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही दगड निलेश राणे यांच्या गाडीवर पडले. त्यामुळे आक्रमक झालेल्या निलेश राणे यांनी आपल्या भाषणात भास्कर जाधव यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. 


भास्कर जाधव यांनी यापुढे सभा घ्याव्यात. ते सभा घेतील, तिकडे मीदेखील सभा घेईन. पण तू राहिलास तर पुढची सभा होईल, असा गर्भित इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला. भास्कर जाधव विनाकारण सगळ्या सभांमध्ये नारायण राणे यांच्यावर टीका करतात. आमच्यावर केलेली टीका आम्ही खपवून घेऊ. पण राणे साहेबांविषयी वाकडंतिकडं बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले.


राणे साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला अन् त्यासाठी घर गहाण ठेवलं: निलेश राणे


निलेश राणे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील एक किस्सा सांगितला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी राणे साहेबांना बोलावून घेतलं. ते  म्हणाले की, 'नारायण आपल्याला काँग्रेसचे सरकार पाडलं पाहिजे'. तेव्हा राणे साहेबांनी बाळासाहेबांना शब्द दिला, यावेळी आपण सरकार पाडण्याचा प्रयत्न करु. तेव्हा राणे साहेबांकडे पैसे नव्हते, केवळ कार्यकर्त्यांची फौज होती. त्यांनी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना गोरेगावाच्या मातोश्रीच्या क्लबमध्ये नेले. त्यावेळी पैसे नव्हते म्हणून राणे साहेबांनी घर गहाण ठेवले. पण त्यांनी कधीही बाळासाहेबांकडे पैसे मागितले नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा उभा राहणारा एकमेव नेता म्हणजे नारायण राणे आहेत, असे निलेश राणे यांनी म्हटले.


बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हा राणे साहेब जेवले नाहीत: निलेश राणे


बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा आम्ही सगळे लंडनला होतो. बाळासाहेब गेल्याची बातमी समजल्यानंतर नारायण राणे दिवसभर जेवले नाहीत. त्यावेळी आमचं सगळं घर रडलं होतं, अशी आठवण निलेश राणे यांनी सांगितली. भास्कर जाधव १९९५ आणि १९९९ दोनवेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आला. २००४ साली त्यांना तिकीट मिळालं नाही तेव्हा ते मातोश्रीबाहेर रडत होते. त्यानंतर त्यांनी चिपळूणला येऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्या संपूर्ण निवडणुकीत भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंना शिव्या घातल्या होत्या, असे निलेश राणे यांनी सांगितले.


आणखी वाचा


राणे पिता-पुत्रांनी उच्छाद मांडलाय, प्रत्येक तालुक्यात त्यांच्यासोबत अशाच घटना घडू शकतात; चिपळूणमधील राड्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया