मुंबई: मी शरद पवारांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष झालो असतो, अशी भाषा करणारे अजित पवार त्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत, अशी घणाघाती टीका आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली. अजित पवार यांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापासून कोणी रोखले होते. पण दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशनात भाषणाची वेळ आली की, तुम्ही बाथरुममध्ये जायचात. तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी बोलता येत नाही, या तुमच्या मर्यादा होत्या. तुम्ही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भावाचा मुलगा होतात म्हणून उपमुख्यमंत्री झालात. नाहीतर तुमचं काय कर्तृत्त्व होतं, तुमच्यावर आंदोलनाचा एकतरी गुन्हा दाखल आहे का?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. ते शुक्रवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


या पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. तुम्हाला आजपर्यंत जे काही मिळालं ते शरद पवार यांच्यामुळेच मिळाले. अजित पवार यांनी किमान या उपकारांची जाणीव ठेवली पाहिजे. मात्र, ते आता शरद पवार यांच्यावरच टीका करत आहेत. मी इतका कृतघ्न माणूस महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात पाहिला नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.


तुमच्या तुसड्या स्वभावामुळे माणसं बाजूला उभी राहायला घाबरतात, सेल्फी काय काढणार?


अजित पवार यांनी बारामती येथील आपल्या भाषणात सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. मी फक्त सेल्फी काढत फिरत नाही, कामं करतो, असे अजितदादांनी म्हटले होते. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. सेल्फी काढण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते. तुमचा तुसडा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सामान्य माणूस तुमच्या बाजूला उभाही राहू शकत नाही. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सामान्य लोकांना तसे वाटत नाही. त्यामुळे लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढतात, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. 


शरद पवारांनी युनोमध्ये जाऊन भाषण केलंय, अजित पवारांना जमणार आहे का?


अजित पवार यांनी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष झाल्यापासून पक्षासाठी काय निर्णय घेतला आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचे नागालँड आणि झारखंडमध्येही खासदार आहेत. अजित पवारांनी एकदा तिकडे जाऊन भाषण करावे. शरद पवार साहेबांनी युनोमध्ये शेतीच्या विषयावर इंग्रजीत दीड तास भाषणं केले आहे. ते शरद पवार आहेत. अजित पवारांनी स्वत:ची तुलना शरद पवार यांच्याशी करु नये. तुम्ही त्यांच्या सेंटिमेंटर एवढेही नाही. त्यामुळे अजित पवारांनी मर्यादा ठेऊन बोलावे, असे आव्हाडांनी म्हटले. 


शिखर बँकेत तुम्ही घोटाळा केला अन् नाव शरद पवारांवर आलं: आव्हाड


जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. अजित पवार यांनी शिखर बँकेत घोटाळा केला आणि नाव शरद पवार यांच्यावर आले. अजित पवार यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली, म#$% भाषा केली. त्यांच्याजागी आम्ही असतो तर शरद पवारांनी आम्हाला पक्षातून बाहेर काढले असते. अजित पवार यांनी त्यांच्या ३५ वर्षांच्या राजकीय आयुष्यात असा एकतरी निर्णय सांगावा, जो महाराष्ट्राला आवडला असेल, जे धोरण जनतेला आवडंल असेल. हे सांगण्यासाठी मी ४८ तास देतो. बारामतीमध्ये येणारा सीएसआर फंड हा अजित पवारांच्या नावावर येतो का? हा फंड शरद पवार यांचे उद्योजक मित्र देतात, असे आव्हाड यांनी सांगितले. 


आणखी वाचा


ज्यांनी खाऊ घातलं त्यांचा झाला नाही, तो महाराष्ट्राचा काय होणार? आव्हाडांचा अजित पवारांवर घणाघाती प्रहार