Hasan mushrif: कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापूरनंतर आता कोल्हापूरमध्ये आपला मोर्चा वळवला आहे. गेल्या महिन्यात सोलापूर दौरा केल्यानंतर शरद पवार आता 4 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर असून आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. येथील कार्यक्रमात, माळशिरस मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले आणि लोकसभा निवडणुकीत तुतारी हाती घेतलेल्या उत्तम जानकर यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्ये जाऊन त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत हसन मुश्रीफ यांनी उत्तम जानकर यांच्यावर टीका केला होती, या टीकेचा संदर्भ देत जानकर यांनी हसन मुश्रीफ यांना चक्क गेंडा म्हणत टीका केली. माझ्यावर कागलच्या नेत्यांनी टीका केली, म्हणून मी इथपर्यंत आलोय, असे म्हणतच त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. 


लोकसभा निवडणुकांवेळी माढा मतदारसंघात उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी तुफान बॅटींग केली होती. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यावर शाब्दीक हल्ले चढवले होते. त्यानंतर, आता विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ते कोल्हापूरमधील कागल येथे आले असता हसन मुश्रीफ व अजित पवार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केलीय. माझ्यावर कागलच्या नेत्यांनी टीका केली, म्हणून मी इथपर्यंत आलोय. जंगलाला आग लागली, बिबट्या जंगल सोडून पळाला आणि त्याच्यामागे गेंडासुद्धा पळून गेला, असे म्हणत नाव न घेता अजित पवार आणि हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला. या बहाद्दराला काय दिलं नाही, गोकुळचं दुध प्यायला दिलं,काजू बदाम खायला घातलं. गोरगरीब शेतकऱ्याला कर्ज मिळावं यासाठी याच्याकडे केडीसीसी बँकेच्या चाव्या दिल्या. मात्र, या माणसानं भ्रष्टाचार केला म्हणून याच्याकडे ईडी आली, पण ईडी आल्यावर पोटासहीत पळाला. हा माणूस नतद्दष्ट निघाला, अशा शब्दात उत्तम जानकर यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला. साखर कारखान्याला नुसतं संताजी नाव दिलं, याला तर भ्रष्टाचारी साखर कारखाना नाव दिलं पाहिजे, असे म्हणत मुश्रीफ यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरुनही जानकर यांनी टीका केली. 


शरद पवारांचीही टीका, दिला इशारा


दरम्यान, कागलमधील सभेत बोलताना शरद पवार यांनी देखील हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका. या तालुक्यातून एका व्यक्तीला आम्ही सर्वकाही दिलं. पण संकट आल्यानंतर साथ सोडून भलत्याच्या मागे गेले. त्यांच्यावर ईडीच्या काही चौकशा सुरू केल्यानंतर ते अस्वस्थ झाले. त्यांच्या कुटुंबीयांतील भगिनींनी ईडीने आम्हाला गोळ्या घालाव्या अशी भूमिका घेतली. पण त्यांचा कुटुंबप्रमुख लाचार होऊन भ्रष्टाचाऱ्यांच्या दारी गेला. आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला.  


हेही वाचा


मुश्रीफांना जागा दाखवणार, समरजितला मंत्री करणार; शरद पवारांचा गैबी चौकातून कागलकरांना शब्द