मुंबई: ओबीसी आंदोलनासाठी छगन भुजबळ हेच सर्व काही पुरवत आहेत. तुमचे राजकीय राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला होता. जरांगे यांच्या या आव्हानाला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राजकीय करिअर संपवण्याच्या धमकीला छगन भुजबळ घाबरत नाही. उद्या मी घरी बसलो तरी ओबीसी समाजाच्या मुद्द्यावरुन रस्त्यावर उतरुन लढेन, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. ते शनिवारी जालन्याला लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या भेटीसाठी रवाना होण्यापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे, मग आमदारीकचे काय घेऊन बसला आहात. माझं राजकीय करिअर हे पुढे न्यायचं की नाही, हे माझ्या पक्षाच्या आणि जनतेच्या हातात आहे. जनतेचं कोर्ट हे सर्वश्रेष्ठ आहे. जरांगे म्हणतात त्याप्रमाणे माझं मंत्रिपद गेलं, राजकीय करिअर उद्ध्वस्त होऊन मी घरी बसलो तरी मी ओबीसींच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरून लढत राहीन, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.


मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींपेक्षा जास्त सवलती: छगन भुजबळ


मराठा समाजावर अन्याय करा, असे आम्ही कुठे म्हणतोय. आम्ही म्हणतोय की, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. एवढंच नव्हेतर सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना आज या क्षणाला ओबीसींपेक्षा जास्त सवलती मिळत आहेत. आमचा याला विरोध नाही. मग आणखी काय पाहिजे तुम्हाला, असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला. राज्य सरकार घरांची व्यवस्था करत आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहे. कर्जमाफीच्या योजना आखत आहे, फी माफी करत आहे. शहरांमध्ये शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहं उपलब्ध करुन देत आहे, वसतिगृह नसतील तर विद्यार्थ्यांना पैसे देत आहे. मग आता काय अडचण आहे, असे भुजबळ यांनी विचारले.


छगन भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं नाही तर नाव सांगणार नाही: मनोज जरांगे पाटील


मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांच्यावर आगपाखड केली होती. ओबीसी आंदोलक आमचे विरोधकच नाहीत. तो येवलावाला काड्या करत आहे. लक्ष्मण हाकेंना (Laxman Hake) भुजबळांनीच उभे केले आहे. ओबीसी आंदोलनाला भुजबळच सगळे पुरवत आहेत. तुमचे राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केले तर नाव बदलेन, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता.


भुजबळ अनेक दिवसांपासून मराठा नोंदी रद्द करा असे म्हणतात. मंडल आयोगाने दिलेल्या आरक्षणाव्यतिरिक्त दिलेले आरक्षण रद्द करा. मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ही रद्द करा.  त्याने टोळी तयार केली आहे. 16 टक्के आरक्षण तुम्ही कसे घेतलं, आता दाखवतो. येवलावाल्याची नियत काय आहे हे समजले. मराठ्यांच्या हक्काच्या नोंदी रद्द करा, असे ते म्हणतात. मराठा नेत्यांनी आतातरी जागे व्हावे. मराठा कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या तरी ते म्हणतात रद्द करा, याकडे मनोज जरांगे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. 


आणखी वाचा


'तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन'; जरांगे पाटलांचा भुजबळांना गंभीर इशारा