सातारा: नुकत्याच पार पडलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या चुरशीच्या लढाईत भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना पराभवाची धूळ चारली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) या बालेकिल्ल्यात विजय खेचून आणल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता उदयनराजे भोसले यांनी आगामी काळात सातारा जिल्ह्याच्या (Satara) राजकारणावर आमचीच पकड राहील, असे सांगत दंड थोपटले. ते शुक्रवारी साताऱ्यातील कोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.


यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत शा‍ब्दिक फटकेबाजी केली. आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? कोणीही किती शड्डू ठोका, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिले. आता कोणी कितीही शड्डू ठोकले, कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव  महेश शिंदे, शिवेंद्रराजे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. 


यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या समर्थकांना गाफील न राहण्याचा सल्लाही दिला. उदयनराजे आता निवडून आले म्हणजे सगळे झाले, असे समजू नका. तुम्ही निवांत राहिलात तर मेलाच म्हणून समजा, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. 


साताऱ्यातील चुरशीच्या लढाईत उदयनराजे भोसले यांचा विजय


सातारा लोकसभा निवडणुकीच्या लढाईत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा 32,217 मतांनी पराभव केला होता. या विजयानंतर जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला होता. या विजयानंतर गुलालात माखलेल्या उदयनराजे भोसले यांची विजयी मिरवणूक सर्वांच्याच लक्षात राहिली होती. सातारा लोकसभेत पिपाणी या चिन्हाने शशिकांत शिंदे यांचा घात केला होता. पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37,062 मतं मिळाली होती. हीच मतं उदयनराजे भोसले यांच्यादृष्टीने निर्णायक ठरली होती.


उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीत तळ ठोकून बसले होते. अनेक प्रयत्नांती त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन भाजप नेतृत्त्वाने त्यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली होती. मात्र, शरद पवार यांचे आव्हान असल्यामुळे उदयनराजे भोसले यांच्यासाठी साताऱ्याची लढाई अवघड मानली जात होती. परंतु, उदयनराजे भोसले यांनी या चुरशीच्या लढाईत बाजी मारत साताऱ्याच्या राजकारणात पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 


आणखी वाचा


शरद पवारांचा नाईलाज, राज्यातील दोन-तीन जिल्ह्यात अस्तित्व राहिलं : खासदार उदयनराजे भोसले