मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी उघड केली आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तारावेळी झालेली परिस्थितीवर बोलताना, वेगवेगळी परिस्थिती घडत असते, पण हरकत नाही. मला मंत्री का केलं नाही हे प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी जास्त बोलणे टाळले. पण, राज्यसभा खासदार किंवा राज्यपाल पदासंदर्भातही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी करू काय, असा थेट सवाल भुजबळ यांनी विचारला आहे. दरम्यान, नाराज झालेल्या छगन भुजबळ यांना राज्यसभा खासदार किंवा राज्यपाल (Governor) पदाची संधी देण्यासंदर्भात महायुतीमध्ये चर्चा सुरू असतानाचा भुजबळ यांनी थेट नकार दिला आहे.
मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावण्याचा प्रकार आहे. राज्यपाल होऊन मी करू काय, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. माझं काम गोरगरिबांच्या अडचणी सोडवणं आहे, त्यांच्यासाठी भांडणं आहे. राज्यपाल होऊन मी त्या समस्या सोडू शकणार आहे का? मी राज्यपाल पदाचा अपमान करू इच्छित नाही. पण, मी असा मोकळा ठीक आहे अशा शब्दात राज्यपाल पदही आपणास नको असल्याची भूमिका भुजबळ यांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली.
लोकसभेवेळीही तिकीटासाठी उशीर केला
लोकसभा निवडणुकांवेळी तुम्हालाचा उभ राहावं लागेल एस मला सांगितले होते. नाशिकमध्ये तुम्ही चांगलं काम केल आहे, सर्व समाज आपल्यासोबत आहे. एक महिना झाला, पण माझ नाव जाहीर केलं नाही, त्यामुळेच मी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. राज्यसभा आली तेव्हा मी म्हणालो राज्यसभेवर जातो. मात्र, सुनेत्रा निवडणुकीत पडलेल्या आहेत, त्यांना राज्यभेत पाठवलं. दुसरी राज्यसभा आली तेव्हा नितीन पाटील यांना करायचं, त्या व्यक्तीला मी ओळखतही नाही. यावेळी, स्वत: का निर्णय घेतला असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
माझ्या लोकांना वाऱ्यावर कसा सोडू?
निवडणुकीत जरांगे पॅटर्न आला,पण जरांगे कुठेच आले नाहीत. ते येवल्यात आले आणि लीड कमी झालं आणि 60 हजारांनी निवडून आलो. परत मला म्हणाले विधानसभेचा राजीनामा द्या, मी लोकांना वाऱ्यावर कसं सोडू मी म्हणालो दोन वर्षानी बघू, असे म्हणत भुजबळ यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी जाहीर केली. मला वाटल माझं नाव मंत्रिपदासाठी येईल. कारण, पक्ष स्थापनेपासून मी पक्षासोबत आहे. अजित पवारांना पहिला पाठिंबा देणार मीच होतो. त्यामुळे, मानसन्मानला धक्का लागला तर ते योग्य नाही, असेही भुजबळ यांनी म्हटले. मात्र, अजित पवार यांचं नेतृत्व चांगलं आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं.