अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती (Amravati) जिल्ह्यात महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपाचा तिढा चालू होता. आता मात्र हा तिढा अखेर सुटला असून भाजपने येथे आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. येथील विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी रात्री उशिरा भाजपत (BJP) जाहीर प्रवेश केला असून भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 


राणा यांचा भाजपत जाहीर प्रवेश


भाजपने अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. त्या अमरावतीच्या विद्यामान खासदार आहेत. महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्या गेल्या कित्येक दिवसांपासून प्रयत्न करत होत्या. त्यांच्याविरोधात चालू असलेल्या जात वैधता प्रमाणपत्राविषयीच्या खटल्यामुळे भाजपनेही त्यांना उमेदवारी देण्याविषयी साधवगिरीची भूमिका बाळगली होती. आता मात्र महायुतीचा या जागेवरचा उमेदवार ठरला असून येथून नवनीत राणा याच महायुतीच्या उमेदवार असतील. राणा यांनी 27 मार्च रोजी भाजपत जाहीर पवेश केला. त्यानंतर भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. म्हणजेच राणा या आता कमळ या निवडणूक चिन्हावरच ही निवडणूक लढवणार आहेत. 






तिकीट मिळावे यासाठी शर्थीचे प्रयत्न 


2019 सालच्या लोकसभा निवडणुकीपासून नवनीत राणा या एनडीएचा भाग राहिलेल्या आहेत. त्यांनी संसदेत वेगवेगळी महत्त्वाची विधेयकं मजूर होताना भाजपच्या समर्थनार्थ मत दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीतही महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी राणा यांचे प्रयत्न चालू होते. त्यासाठी राणा यांचे पती तथा आमदार रवी राणा यांनी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची अनेकवेळा भेट घेतली होती. राणा दाम्पत्य तसेच फडणवीस यांची या विषयावर अनेक बैठका झाल्या. त्यानंतर आता शेवटी राणा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. राणा आता अमरावतीतून महायुतीच्या अधिकृत उमेदवार असतील.


ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती- वानखेडे


दरम्यान, या जागेवर काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामळे वानखेडे विरुद्ध राणा असा सामना येथे पाहायला मिळणार आहे. याबाबत वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिलीआहे. राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे आता माझा विजय सुकर झाला आहे, असे ते म्हणाले आहेत. तसेच ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार असून नवनीत राणा यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि अमरावती जिल्ह्यातील नेत्यांना योग्य वागणूक दिलेली नाही. त्यामुळे माझा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे, असेही ते म्हणाले.