मुंबई : लोकसभा निवडणुकांचा सातवा आणि शेवटचा टप्पा 1 जून रोजी होत असून राजकीय रणधुमाळी आता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, अद्यापही उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालसह काही राज्यांत निवडणुका होत आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी मतदारसंघात प्रचाराचा जोर दिसणार आहे. तत्पूर्वी, भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (Narendra Modi) विजयाचा विश्वास व्यक्त केला असून आज एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये, देशासह आंतरराष्टीय घडामोडींवर भाष्य केलं. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना, लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) निकालाच्या उत्सुकतेबाबतही मोदींनी सांगितलं. 


विद्यार्थ्यांना जसं परीक्षेच्या निकालादिवशी उत्सुकता आणि मनात थोडी धाकधूक असते, तसं लोकसभा निवडणुकांच्या निकालाची तुम्हाला धाकधूक आहे का, तुमचा निकालादिवशीचा दिनक्रम कसा असतो. निकालाच्या दिवशी तुमची दिनचर्या काय असते?, असा सवाल मोदींनी विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना मोदींनी गुजरात निवडणुकांची 2002 मधील जुनी आठवण सांगितली. त्या दिवशी मी एक्स्ट्रा कॉन्सियस असतो, त्या दिवशी ध्यान साधनेचा वेळ वाढवतो. माझ्या खोलीत त्या दिवशी कोणालाही एंट्री नसते. निवडणुकीसंदर्भात त्या दिवशी मला फोन करण्यास कोणालाही परवानगी नसते, दुसरं महत्त्वाचं काम असल्यास तो फोन घेतला जातो. 


मी गुजरातमधील 2002 ची एक आठवण सांगतो, असे म्हणत मोदींनी 2002 मधील निवडणुकांचा प्रसंग सांगितला. मी 2001 साली मुख्यमंत्री बनलो आणि 2002 साली गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्यावेळी, जे निवडणूक आयुक्त होते, ते मला सातत्याने परेशान करत होते. अनेक समस्या माझ्यापुढे होत्या. लोकांना आमच्या विजयाबद्दल संशय वाटायचा. पण, त्या निकालाच्या दिवशी मी फोन बंद करुन ठेवला होता. मुख्यमंत्री असल्याने माझ्याकडे जे घर होते, त्या घरातच मी एकटा होता. दुपारचे 1 ते 1.30 वाजता माझ्या घराच्या दरवाजावर खटाखट आवाज आला. मी दरवाजा उघडला, सुरक्षा जवानाने एक चिठ्ठी दिली आणि सांगितले की बाहेर पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला शुभेच्छा देऊन अभिनंदन करत आहेत. त्यावेळी, दुपारी दीडच्या सुमारास मला निकालाचा अंदाज आला. 



मी एका मिशनसाठी जीवाची बाजी लावून काम करतो


मी पहिल्यांदा एक चांगला पुष्पहार आणि मिठाई आणण्यास सांगितली. त्यानंतर केशुभाई पटेल यांच्याकडे गेलो. त्यांना हार घालून मिठाई दिली, त्यानंतरच विजयाचा सेलिब्रेशन केलं. त्याअगोदर मी विजय साजरा केला नाही. आताही मी निकालाच्या दिवशी विरक्त भावनेने शांत राहतो, स्वत:मध्येच गुंतून असतो. एक्झिट पोलच्या दिवशीही मी त्यापासून स्वत:ला दूर ठेवतो. तर, दुपारी अंदाज येईपर्यंत मी निवांतच असतो, असा दिनक्रम असल्याचं मोदींनी सांगितलं. तसेच, मी ना आकड्यांवर लक्ष्य देतो ना, निकालावर लक्ष्य देतो. कारण, मी एक मिशन घेऊन जीवाची बाजी लावतो, असे मोदींनी म्हटले.