Narayan Rane on Ratnagiri Sindhudurg Loksabha : भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरुन  चांगलेच आक्रमक झाले आहेत. महायुतीतील नेत्यांच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Loksabha) जागेवरुन भेटीगाठी झाल्या असल्याचे नारायण राणेंना सांगितले. त्यानंतर त्यांनी आक्रमक होत उत्तर दिले. "मी काय करु त्याला. कोणीही एकमेकांना भेटू शकतं. तुम्हीही जाऊन भेटू शकता. रत्नागिरी सिंधुदुर्गबाबत सगळं झालेलं आहे. ठरलेलं आहे. कोण भेटला म्हणून काय होत नाही. भेटायचं नाही असंही नाही. भेटला असेल तर त्याला मी जाऊन सांगतो की नमस्कार आमचं ठरलंय जा" असं नारायण राणे म्हणाले. रत्नागिरी येथे नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. 


महायुतीच्या पुढाऱ्यांनी अपशकून करु नये


नारायण राणे म्हणाले, कोणा एका व्यक्तीच्या सांगण्याने काही होत नाही. आम्ही अवघडच सोप करु एवढे ताकद आमच्यामध्ये आहे. महायुतीच्या पुढाऱ्यांनी अपशकून करु नये. मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावे. हॅटट्रीक पूर्ण करावी. या देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेत प्रगती करता यावी. आपला देश तिसऱ्या क्रमांकावर यावा. अमेरिका, चीन आणि नंतर भारत असावा आणि त्यासाठी परत एकदा आमच्या मोदींना संधी देण्यात यावी. मोदींची हॅटट्रीक होणार आहे आणि 400 जागाही येणार आहेत. 400 जागांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा खासदार असणारच आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. मला माहिती असते की पत्रकार काय अपेक्षा करतात मी ते अजिबात बोलणार नाही.


नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका 


नारायण राणे म्हणाले, ज्यांच्याकडे काहीच नाही, असे लोक मोदींवर टीका करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जगभरात कौतुक होतं आहे. मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मोदींची प्रतिमा स्वच्छ आहे. अनेक महापुरुष झाले,पण मोदी महान आहेत. खासदार झालो तर अभिमान वाटेल असं काम करेन. अर्थव्यवस्थेची जाण असलेला माणूस आपला पंतप्रधान आहे, असं म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधलाय. 


नुसतं दाढी वाढवून मोदींवर टीका करत आहेत


लोकांना फक्त हे देऊ ते देऊ सांगणारे राहुल गांधी लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार आहेत का? असा सवालही नारायण राणे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केलाय. दोन दिवसांत पुन्हा येतो. तुम्ही मला बोलवत तरीही आणि नाही बोलवत तरी प्रचारासाठी तरी नक्की येईल.  नुसतं दाढी वाढवून यात्रा करत मोदींवर टीका करत आहेत. कोकणात विद्यापीठे नाहीत, मोठे उद्योगधंदे नाहीत. निवडणूक झाली की दोन महिन्यात सगळे प्रश्न सोडवून दाखवेन, असंही नारायण राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 




इतर महत्वाच्या बातम्या 


मोदींची प्रतिमा स्वच्छ, अनेक महापुरुष झाले, पण मोदी महान आहेत, त्यांना अर्थव्यवस्थेची जाण, नारायण राणे कौतुक करताना थांबेनात