Darhysheel Mohite Patil Met Umesh Patil : आचारसंहीता लागू झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरु झाल्या आहेत. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) आणि शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Darhysheel Mohite Patil) यांची पुण्यात भेट झाली आहे. उमेश पाटलांनी काल शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यात भेट घेतल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. उमेश पाटील हे शरद पवार गटात जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशातच खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी उमेश पाटलांच्या पुण्यातील घरी भेट दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


उमेश पाटील शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता


माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी उमेश पाटलांच्या पुण्यातील घरी त्यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये मोहोळ मतदारसंघातील राजकीय विषयावर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, मोहिते पाटील यांनी उमेश पाटलांची भेट घेतल्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे, उमेश पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. 


उमेश पाटील आपल्या राजीनाम्यावर ठाम


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्ष सोडू नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले. मात्र, उमेश पाटील आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. महाविकास आघाडीतील पक्षाकडून त्यांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण मिळाले असून ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीत जाणार की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेणार, याची मोहोळच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. मात्र, आज ते शरद पवारांच्या भेटीला आले आहेत, यामुळे ते पुन्हा शरद पवारांसोबत  येणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या आहेत. 


शरद पवारांच्या भेटीनंतर काय म्हणाले उमेश पाटील?


मोहोळची चर्चा आधीपासून आहे, मी जेव्हापासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आहे, तेव्हापासून माझा तेथील हुकूमशाहीला आणि दडपशाहीला विरोध असल्याचे उमेश पाटील म्हणाले होते. तो विरोध पक्ष एकत्र असताना आणि शरद पवारांसोबत काम करत असताना पासूनचा आहे. तो नवीन नाही. त्या ठिकाणी असलेली परिस्थितीबाबत बोलण्यासाठी मी आज शरद पवारांच्या भेटीसाठी आलो आहे, असंही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं. राजन पाटील जिथं असतात तोच आमदार निवडून येतो असं पक्षाला समज झाला असेल.  पण आता काळ बदललंय, लोकांची भूमिका बदलली आहे.  हे पक्षापर्यंत कसं पोहोचत नाहीये हे मलाही न समजणारे कोडे आहे. एका व्यक्तीला न्याय देण्यासाठी सर्वासामान्य लोकांवर अन्याय झाला असल्याचे उमेश पाटील म्हणाले होते.


महत्वाच्या बातम्या:


मोहोळला गुलामगिरीतून मुक्त व्हायची संधी आलीय, अजित पवार गटात खदखद, उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत