Raj Thackeray & Uddhav Thackeray: तुमचा बेपारी ब्रँड संपेल, पण आमचा मराठी ठाकरे विचार कायम राहील; मनसेच्या संदीप देशपांडेंचं भाजपला सणसणीत प्रत्युत्तर
MNS leader Sandeep Deshpande: मनसेच्या संदीप देशपांडे यांनी भाजपवर आक्रमक भाषेत टीका केली आहे. ब्रँड ठाकरे संपला असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना सणसणीत प्रत्युत्तर

Raj Thackeray & Uddhav Thackeray: आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यावर भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) शाब्दिक द्वंद्व रंगताना दिसत आहे. बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल गेला. बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ब्रँड नाहीत, अशी बोचरी टीका भाजपच्या नेत्यांकडून अलीकडच्या काळात सातत्याने केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक ट्विट करुन भाजपला सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे हा ब्रँड (Thakeray Brand) नाही विचार आहे. ब्रँड हा बेपारी लोक उभा करतात तर विचार हा संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो. पैसे ओतून ब्रँड तयार करता येतो पण चळवळ नाही.पैसे संपले की ब्रँड संपतो पण विचार नाही.तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही, जय महाराष्ट्र, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. यावर आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ठाकरे हा ब्रँड नाही विचार आहे.ब्रँड हा बेपारी लोक उभा करतात तर विचार हा संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो.पैसे ओतून ब्रँड तयार करता येतो पण चळवळ नाही.पैसे संपले की ब्रँड संपतो पण विचार नाही.तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही--जय महाराष्ट्र
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 22, 2025
काही दिवसांपूर्वी भाजपने संदीप देशपांडे यांच्या दादरमधील 'इंदुरी चाट' या हॉटेलवरुन टीकेची झोड उठवली होती. या हॉटेलमध्ये मराठी आचारी नाही, परप्रांतीय आचारी आहे, असा मुद्दा उपस्थित करत भाजपने संदीप देशपांडे यांना मराठीच्या मुद्दयावरुन घेरले होते. या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय. नाव देवनागरीत लिहिलं म्हणून मराठीपण? यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी ठेवता येत नाही, आणि हे मराठी महापौराच्या गप्पा मारत आहेत. महापौर मराठीच होणार, पण महायुतीचा आणि हिंदुत्ववादी विचारांचा, असे भाजपने म्हटले होते. संदीप देशपांडे यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, "इंदुरी चाट"वरून मला ट्रोल करणाऱ्यांना इतिहास माहीत नाही. मराठे इंदूर भागात गेले, तिथे त्यांनी स्थानिक पदार्थांवर आपला प्रभाव टाकला. तेच पदार्थ पुढे 'इंदुरी फूड' या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांना इतिहास माहीत नाही. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची ही दिवाळखोरी आहे", असे प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी दिले होते.
आणखी वाचा
मुंबईत शिवाजी पार्कमध्ये पण मराठी माणूस उरला नाही; पुरस्कार सोहळ्यातून महेश मांजरेकरांची खंत
'राज ठाकरेंनी भेटायला बोलावलं, म्हणाले, इथे हिंदीत बोला...'; संजय मिश्रा यांनी सांगितला 'तो' किस्सा























