मुंबई : संपूर्ण बीड जिल्ह्यात 31 ऑगस्ट पासून ते आतापर्यंत सातत्याने सर्वदूर पाऊस पडत असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच जलाशय तुडुंब भरून नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत. जिल्ह्यावरील जलसंकट दूर झाल्याची बातमी जरी आनंददायक असली, तरी सततच्या पावसाने अतिवृष्टी व काही ठिकाणी पुराचा धोका निर्माण झाला असून त्यामुळे खरीप हंगामातील शेती पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. तर काही महसूल मंडळांमध्ये 24 तासांमध्ये अतिवृष्टीच्या निकषांप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडला असून, राज्य शासनाच्या महसूल विभागाने यापूर्वीच काढलेल्या आदेशाला अनुसरून महसूल व कृषी विभागाने पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांच्या तसेच घरांच्या पडझडीच्या आदी नुकसानीचे तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत व शेती पिकांच्या 33% च्या मर्यादेपेक्षा जास्त नुकसानीचे अहवाल राज्य शासनाकडे मदतीच्या मागणीसह तातडीने पाठवावेत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. 


बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचे ही संरक्षण लागू राहिल


बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामात एक रुपयात पिक विमा योजनेत सहभाग घेतला असून आपल्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीच्या नियमानुसार विमा कंपनीला देखील निर्धारित वेळेत कळवावी, जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचे ही संरक्षण लागू राहिल,असेही आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 


पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान मोठे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले


दरम्यान सध्या जिल्ह्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान मोठे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले असून त्याउपर नद्यांमधून व नाल्यांमधून पाणी वाहत आहे. पावसाचा जोर आणखी पुढील 24 तास जर इतकाच प्रखर राहिला तर काही नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात व त्यामुळे नदीकाठच्या गावांना किंवा नदीकाठच्या शहर वस्त्यांना देखील पुराचा धोका निर्माण होऊ शकतो.  त्यामुळे विशेष करून जलाशय व नदीकाठच्या गावच्या नागरिकांनी सतर्क रहावे या आवाहनासह नदीच्या पूर नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचे इतरत्र स्थलांतर करण्यात यावे अशा पद्धतीच्या सूचना देखील धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.



जिल्ह्यात पावसाचा जोर आणखी कायम राहिल्यास काही नद्या व जलाशय धोक्याची पातळी ओलांडू शकतात, त्यामुळे जलाशय व नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. पुराचा धोका उद्भवू शकणाऱ्या नद्यांच्या नियंत्रण रेषेच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत जिल्हा प्रशासनाला योग्य त्या सूचना मुंडे यांनी केल्या आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sharad Pawar : काही घटकांमध्ये मुस्लिमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोण, त्यांची स्थिती चिंताजनक, दारिद्र रेषेखाली असणाऱ्यांचं प्रमाण दुर्लक्षित करण्यासारखी नाही : शरद पवार