Chandrashekhar Bawankule: शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यातील (Marathwada) वेगवेगळ्या जिल्ह्यात भाजप उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ सभा घेत आहे. दरम्यान, शनिवारी त्यांनी जालना येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. 'उद्धव ठाकरे सोन्याच्या चमच्याने ज्यूस पिऊन मोठे झाले असल्याचा खोचक टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. 


यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेली कामे शिंदे-फडणवीस सरकार करीत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या या टीकेत कोणतेही तथ्य नाही. विकास कामे करणे हे उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाही. तर ठाकरे फक्त सोन्याचा चमच्याने ज्यूस पिऊन मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नये, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. 


पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात जनतेसाठी काहीच विकास कामे केली नाहीत. उद्धव ठाकरेंच्या रक्तातच विकास नाही. ते आमदारांच्या पत्रावर देखील ते सही करत नव्हते. मग विकास कामे कशी काय करू शकतात, असेही बावनकुळे म्हणाले. ठाकरे विकासावर जेव्हा बोलतात, तेव्हा या गोष्टीचं मला वाईट वाटते. कोरोना काळात त्यांनी अठरा महिने मातोश्रीच्या बाहेर पाऊल ठेवले नाही. त्यांच्यामुळेच अनेक प्रकल्प त्यावेळी महाराष्ट्राबाहेर गेले. वेदांता प्रकल्पाला ते जागा देऊ शकले नाही. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, अशी टिकाही त्यांनी केली.


पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न! 


पुढे बोलताना त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारे एक युनिट भाजपमध्येच कार्यरत असून, जनतेत ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत आम्ही जनतेला कन्व्हेन्स करीत असल्याचे बावनकुळे म्हणाले. तर पंकजा मुंडे या आमच्या पक्षाच्या महत्वाच्या नेत्या असल्याचं देखील ते म्हणाले. 


विरोधी पक्षातील काही आमदार भाजपात येण्याच्या तयारीत 


शिंदे गटातील 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सध्या हे प्रकरण घटनापीठाकडे आहे. मात्र या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली तरी आम्ही बहुमत सिद्ध करू, असे बावनकुळे म्हणाले. तसेच विरोधी पक्षातील काही आमदार भाजपात येण्याच्या तयारीत आहेत. ते भाजपात येवू नये म्हणून सरकार पाडण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. त्यामुळे जेव्हा बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल, तेव्हा आम्हाला 184 आमदारांचा पाठिंबा असेल, असा दावा बावनकुळे यांनी यावेळी केला आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


बावनकुळेंच्या आधी पंकजा मुंडेंचा भाषण करण्याचा हट्ट, पण व्हिडीओ एडिट करून व्हायरल; यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल