Navneet Rana : राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) दांपत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवत राज्य सरकारला फटकारलं आहे. नेमकं काय म्हटलं मुंबई सत्र न्यायालयाने?


राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं 
राणा दांपत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही. राणा दांपत्याला जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे.  न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणांना दिलेल्या जामीनाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली होती. त्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या नोटीसनंतर राणा घराबाहेर पडले नाहीत. राणा दाम्पत्याना अटक होण्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर आयपीसी कलम 124 A अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे.असं मत मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केलंय.
 
'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यावरून वादानंतर अटक 


23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील खाजगी निवासस्थान 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या जाहीर घोषणेवरून झालेल्या वादानंतर अटक करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता.


जामीन मंजूर करताना पाच अटी
मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या होत्या. न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. याशिवाय या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही अशीही अट घातली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असेही सांगितले आहे. न्यायालयाच्या या अटींचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे.  जामिनावर सुटल्यानंतर अर्जदाराने असा कोणताही गुन्हा करू नये आणि प्रकरणाशी संबंधित कोणत्याही विषयावर माध्यमांशी बोलू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, आज त्यांची तुरुंगात सुटका होऊ शकते.    


 तोपर्यंत राणा दांपत्याचा मुक्काम मुंबईतच
 खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. कारागृहातून सुटका होताच नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, भायखळा कारागृहात प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नवनीत राणा यांची तब्येत खालावली असल्याचा आरोप करण्यात येतोय. नवनीत राणा यांची काल कारागृहातून सुटका झाली. मात्र, नवनीत राणा यांची तब्येत खालावली असून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यामुळे जोपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळत नाही, तोपर्यंत राणा दांपत्य मुंबईतच थांबणार आहे.