मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत एकनाथ खडसे हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा असतानाही महायुतीचा एकही मंत्री सभागृहात हजर नव्हता. त्यामुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे संतापले. तेव्हा सभापती राम शिंदे यांनी मंत्री शंभुराज देसाई हे सभागृहात येत आहेत, ते वाटेतच आहेत, असे सांगत खडसेंना शांत करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) धावतपळत विधानपरिषदेत आले, त्यावेळी खडसे यांनी त्यांना खडे बोल सुनावले.


आपण अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करत आहोत. अशा महत्त्वाच्या वेळी एकही मंत्री सभागृहात उपस्थित नसणे, यावरुन सरकार किती संवेदनशील आहे, हे दिसते. शंभुराज देसाई सभागृहात धावतपळत आले. मंत्रिमंडळात 42 जण आहेत. मात्र, तुम्ही एकटेच सभागृहात उपस्थित आहात, याबद्दल अभिनंदन. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेसाठी सभागृहात काही मंत्र्यांनी उपस्थित राहावे, ही अपेक्षा असते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.


मला माहिती आहे, तुम्हाला खूप काम असते. रात्री खूप जागरणं होतात. त्यामुळे तुम्हाला सकाळी उठायला वेळ होतो, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. त्यावर शंभुराज देसाई यांनी मी अधिकाऱ्यांकडून ब्रिफिंग घेत होतो, असे म्हटले. मी पोहोचलोच होतो पण लिफ्ट यायला वेळ गेला, असे सांगून शंभुराजे यांच्याकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावर एकनाथ खडसे उसळून म्हणाले की, तुम्हाला ब्रिफिंग घ्यायचं असतं, मग आम्हाला कामं नसतात का? ब्रिफिंग रात्री घ्यायचे. मी पण 15 वर्षे मंत्री राहिलो आहे. कामकाज मलाही माहिती आहे. आम्हाला काही कळत नाही का?, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.


अधिवेशनाचा पूर्ण वेळ केवळ फालतू प्रकरणांमध्ये गेला: एकनाथ खडसे


राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात घोटाळे थांबलेले नाहीत. हे घोटाळ्यांचं सरकार आहे. अधिकारी मुजोर झाले आहेत. राजकीय संरक्षण मिळत असल्यामुळे झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील पीडब्ल्यूडीला एक सोनवणे नावाचा एक अधिकारी आहे. तो सरकारचा इतका लाडका आहे की त्याच्या भ्रष्टाचार विषयबाबत मी दीड वर्ष बोलत आहे. मागच्या काळात रविंद्र चव्हाण मंत्री असताना म्हणाले होते की, त्याला निलंबित करतो. परंतु काहीच केलं नाही. त्याच्यावर 9 चौकश्या सुरू आहेत. अधिवेशनाचा पूर्ण वेळ केवळ फालतू प्रकरणात गेला. कुणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. यात मस्साजोग प्रकरण. मुंडे राजीनामा, कुणाल कामरा, औरंगजेब असले विषय झाले. इथ शेतकऱ्यांच्या विषयांची चर्चा व्हायला पाहिजे होती. अॅकेडमिक चर्चा होण गरजेचे होतं, मात्र ते झालं नाही. राज्याच्या तिजोरीत खळखळट आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.


पाटबंधारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. हजार हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. पाईपलाइन टेंडर काढलं 1800 कोटी रुपयांचे टेंडर काढले निवडणुक काळात ही सगळी टेंडर काढण्यात आली. 25 हजार कोटीची इरिगेशन विभागाने टेंडर काढली. ही का काढली याच उत्तर द्या, असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला.



आणखी वाचा


अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस, 23 दिवसांत कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या, सर्वसामान्यांना नेमकं काय मिळालं?