मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे म्हटले होते. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही थेट पत्रकार परिषदेतूनच पलटवार केला. संजय राऊत हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचं ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांबद्दलची नाराजी उघड केली. त्यामुळे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळले. आता संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.  


संजय राऊत म्हणाले की, चर्चा पूर्णपणे थांबली असे म्हणता येणार नाही. काल दिवसभर आम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्यातील बरेचशे पेज सुटत चालले आहे. एकत्र बसून गुंता सोडवण्याची मानसिकता आमच्या दोघांमध्ये आहे. आम्ही अनेक जागांवरचा तिढा सोडवलेला आहे. महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नईतला मुंबईला येतील ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील आणि मग पुढे काय मार्ग निघेल ते बघू, असे त्यांनी म्हटले. 


राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांना स्थान दिले पाहिजे


नाना पटोले जागा वाटपात अडवणुकीची भूमिका घेत आहेत का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मी असे म्हटलेले नाही. तुम्ही माझ्या तोंडी घालू नका. मी व्यक्तिगतरित्या कोणावरही मतप्रदर्शन केलेले नाही. तेवढी सभ्यता, सुसंस्कृतपणा आमच्यात आहे. प्रत्येक आघाडीत जागा वाटपाचा कुठेतरी अडथळा निर्माण होतो. भाजप - शिवसेना एकत्र होती तेव्हा देखील असे अडथळे होते. काँग्रेस हा एक खूप मोठा पक्ष आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांना त्या त्या राज्यात स्थान दिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. प्रादेशिक पक्षांच्या जोरावरच सध्या राष्ट्रीय राजकारण सुरू आहे. प्रादेशिक पक्ष नसते तर मोदी आज पंतप्रधान होऊ शकले नसते, असे त्यांनी म्हटले. 


मी व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही


आता आपल्या पक्षासोबत हायकमांड चर्चा करणार का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मी यावर आता कुठलेही भाष्य करणार नाही. मी व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही. माझी भूमिका ही पक्षाची असते. उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय मी कधीही काहीही बोलत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. तर नाना पटोले बैठकीत असतील तर चर्चा होणार नाही अशी भूमिका समोर आली होती याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अशा भूमिका आमच्या पक्षाकडून कधी मांडल्याचे मला आठवत नाही. अशा भूमिका कोणी घेत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


आणखी वाचा 


Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला किती जागा? जाणून घ्या