मुंबई : लोकसभेचा (Lok Sabha Election)  निकाल लागताच राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) तयारी सुरू झालीय. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरून महाविकास आघाडीत (MahaVikasAghadi) आतापासूनच कलगीतुरा रंगलाय आहे. काँग्रेसची ताकद वाढल्यानं बदललेल्या परिस्थितीत पुन्हा ठाकरे हाच चेहरा म्हणून पुढे येण्यावर मर्यादा आल्यात. त्यावरून महाविकास आघाडीत पुढे काय होणार, यावर सध्या चर्चा रंगली आहे.  


लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यानं मविआला विधानसभेत सत्ता मिळवण्याचे वेध लागले आहेत . महाविकास आघाडीनं एकत्र लढण्याच्या आणाभाका घेतल्या आहेत. पण अजून जागावाटपाच्या कळीच्या मुद्द्याला हात घालायचा आहे. त्याआधीच संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या चर्चेला हवा दिलीय आहे. उद्धव ठाकरेंची आधीची मुख्यमंत्रि‍पदाची कामगिरी चांगली असल्याचं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरेंचा चेहरा पुढे केला आहे. 2019 मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंचा हात वर करत त्यांना मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर बसवलं होतं पण आता  शरद पवार म्हणतात महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा असणार आहे. पवारांनी उत्तर देण्याआधीच राऊतांच्या प्रस्तावावर खुद्द उद्धव ठाकरेंनी सावध उत्तर दिलं होतं...


मुख्यमंत्रि‍पदावरून कलगीतुरा रंगू शकतो


शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राज्यात काँग्रेस पक्ष मोठा भाऊ बनला. लोकसभा निकालात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकत काँग्रेसनं खुंटा बळकट केलाय.  विधानसभा निवडणूक मविआसोबतच लढण्याचे संकेत दिल्लीकरांनी दिले असले तरी काँग्रेस जास्त जागांचा आग्रह धरण्याची शक्यता आहे, अशा स्थितीत  मुख्यमंत्रि‍पदावरून कलगीतुरा रंगू शकतो.


आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचे चेहरे म्हणून अनेकांचे बॅनर


विधानसभेत सत्ताबदल करायचा आहे, असं पवारांनी अगदी निर्धारानं सांगितलंय. पण सत्ताबदल झाल्यास मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? हा प्रश्न आहे. आतापर्यंत मुख्यमंत्रिपदाचे चेहरे म्हणून अनेकांचे बॅनर झळकलेत त्यात उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, नाना पटोले  या चेहऱ्यांचा समावेश आहे.  


महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाच्या तिढा कसा सोडवणार?


मविआचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरायचा असला तरी विधानसभेचे निकाल मात्र लोकसभेप्रमाणेच लागतील, अशी खात्री पवारांना वाटते. विधानसभेचे निकाल मात्र लोकसभेप्रमाणेच लागतील, असे शरद पवार म्हणाले.  मुख्यमंत्रिपदावरूनच 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेचं बिनसलं होतं. राज्यात मविआचा नवा प्रयोग अस्तित्वात आला होता. आता महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाच्या तिढा कसा सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


हे ही वाचा :


विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवारांनी थेट सांगितलं!