मुंबई: लोकसभेचा निकाल लागल्यानंतर (Lok Sabha Election 2024) आणि आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींनी वेग आल्याचं दिसतंय. कारण राज्यात अवघ्या चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Vidhansabha Election 2024) लागणार आहेत. त्याआधीच सर्वच पक्ष कामाला लागले असून पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत. लोकसभेच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढल्याचं दिसतोय तर अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यानं त्यामागील कारणांचा आढावा महायुतीकडून घेतला जात आहे. 


नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात लोकसभेच्या 30 जागा जिंकल्या आहेत आणि एकमेव अपक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. त्या हिशोबाने, आज जर निवडणूक झाली तर महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडी 150 हून जास्त विधानसभा मतदारसंघात आघाडीवर असल्याचं चित्र दिसतंय. त्याउलट 17 जागा जिंकलेल्या महायुतीला 130 च्या जवळपास जागा जिंकता येतील.


विदर्भात महायुतीला मोठा फटका


महायुतीला सर्वाधिक फटका हा विदर्भात बसताना दिसत असून विदर्भात फक्त 19 मतदारसंघांमध्ये त्यांना आघाडी आहे. तर विदर्भात महाविकास आघाडीची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता असून 42 मतदारसंघात आघाडी घेतली आहे. 


लोकसभेतील निकालानुसार, महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी किती विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी आहे, किती मतदारसंघात महायुतीला आघाडी आहे यावर एक नजर टाकुयात, 


विधानसभा मतदारसंघनिहाय आघाडी


एकूण जागा - 288
मॅजिक फिगर - 145
मविआ - 150 + 
महायुती - 130 +


विदर्भ - एकूण जागा - 62


मविआ - 42
महायुती - 19


मराठवाडा - एकूण जागा- 48


मविआ - 34
महायुती - 12
एमआयएम- 02


मुंबई- 36


मविआ - 20
महायुती - 16


पश्चिम महाराष्ट्र - 59


मविआ - 33
महायुती - 26


उत्तर महाराष्ट्र - 48 


मविआ - 19
महायुती - 29


कोकण- 12


मविआ - 5
महायुती - 7


लोकसभेच्या निकालानंतर केंद्रातील समीकरण बदललं


भाजपचा एकट्याचा आकडा बहुमतापासून दूर राहिला आणि केंद्रातील बरीच समीकरणं बदलली. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळा भाजपच्या एकट्याच्या 272 पेक्षा जास्त जागा निवडून आल्या होत्या. त्यावेळीही मित्रपक्ष सोबत होते पण त्यांची फार गरज उरली नव्हती. ही गोष्ट भाजप आणि मित्रपक्ष दोघांनाही माहिती असल्यामुळे या दहा वर्षात कोणीच फार खळखळ केली नाही. भाजपला कोणावरही अवलंबून न राहता मनासारखे निर्णय रेटून नेता आले. 


आता परिस्थिती वेगळी असेल आणि त्याची छोटी झलक दिसली ती नुकतेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमात. यावेळी मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागल्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळाचा आकार आधीच्या दोन टर्म पेक्षा भरपूर मोठा झाला आहे. हे सरकार पाच वर्ष चालवायचं असेल तर भाजपला भरपूर तडजोडी कराव्या लागणार आहेत. मित्रपक्ष, त्यातही नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू नाराज होणार नाहीत याची सतत काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे. 9 जून नंतर एक गोष्ट तर पक्की झाली आहे की हे नवं सरकार मोदी सरकार नसेल तर एनडीए सरकार असेल. आता येत्या काळात ही परिस्थिती मोदी-शाह बदलणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


ही बातमी वाचा  :