मुंबई : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळेच (ladki bahin yojana) आम्हाला बहुमत मिळाल्याचं महायुतीमधील सर्वच प्रमुख पक्षाचे नेते मान्य करत आहेत. लाडकी बहीण योजनेमुळेचा हा मोठा विजय झाल्याचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून अपात्र लाडक्या बहिणींना कमी करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत 9 लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरल्या असून अद्यापही सरकारकडून स्क्रुटीनी करण्यात येत आहे. त्यातच, यंदाच्या अर्थसंकल्पातून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची घोषणा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटनुसार लाडक्या बहिणींना कुठलीही वाढ मिळणार नाही. याउलट गतवर्षीच्या तुलनेत यंदा लाडकी बहिण योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीमध्ये कपात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरुन, शिवसेना उबाठा आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी वेगळच गणित मांडलं आहे. तसेच, 50 लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र होतील, असा दावा त्यांनी केलाय.
अर्थमंत्री अजित पवार यांनी 7 लाख 20 कोटी रुपयांच बजेट मांडलं. मात्र, मागील बजेटमध्ये 46.46 कोटी रुपये खर्च झाले आहेत. अजित दादा हे आपण तपासून पाहा, जाणीवपुर्वक हा खर्च होत नाही का? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. अजित दादांमध्ये आता बदल झालाय, दादा कविता करायला लागले म्हणून मी ही कविता आणल्या आहेत. मी संघाच्या शाखेत गेलो आहे, मला माहीत आहे वत्सल्य सदवर्ते काय आहे, पण अजित दादा तुम्ही गेले नाहीत, असे म्हणत भास्कर जाधव यांनी अजित पवारांना टोला लगावला.मी पालकमंत्री असताना संघाचं शिबीर माझ्या मतदारसंघात होतं, तेव्हा मी गेलो तर मला पक्षातून विचारण्यात आलं. मात्र, अजित पवार नागपूरला ही कधी गेले नाही, पण कोणाच्या तरी नादाने ते कवी झाले अशी मिश्कील टिपण्णी जाधव यांनी केली.
दादांच गुलाबी जॅकेट गेलं, काम झालं आता जॅकेट निघालं. लाडका, बहिण, भाऊ लाडके आजोबा सांगतील. आम्हाला तीर्थक्षेत्राला घेऊन गेले, आता अर्ध्यात सोडलं की काय? असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला. तसेच, गतवर्षी लाडक्या बहिणींना 46 हजार कोटी निधी मंजूर केला. मात्र, त्यातील 33 हजार कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. आता, यंदाच्या बजेटनुसार ही रक्कम फक्त 36 हजार कोटी एवढी केली आहे. याचा अर्थ 50 लाख महिला या योजनेतून कमी होणार आहेत, असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. त्यामुळे, सरकारकडून सुरू असलेल्या लाडक्या बहीण स्क्रुटीनीतून आणखी किती महिला कमी होणार हा प्रश्न लाडक्या बहिणींसह सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, सध्या जवळपास अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे.
लाडक्या बहिणींसाठी वडेट्टीवारांचे सवाल
अर्थिक खाईत टाकल्याशिवाय राहणार नाही असा अर्थसंकल्पाचा अर्थ निघतोय. 1 लाख 26 हजार कोटींवर तुट गेलीय, असे म्हणत अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला लक्ष्य केलं. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण योजना आणली, सरकार तुम्ही आणलं. चेहरा तुमचा होता मात्र सरकार आल्यानंतर तुम्ही राहिले दोन नंबरला, अशी कोपरखळी देखील वडेट्टीवार यांनी बहिणींनी भरभरुन टाकलं. गरज सरो आणि वैद्य मरो, गुलाबी रिक्षा योजना आणली, त्याचा उल्लेख नाही, सिलेंडर देणार होते त्याचा उल्लेख नाही, शिवभोजन थाळी ही सर्वसामान्य जनतेला चांगली होती त्याचा उल्लेख नाही. कुठे गेला आनंदाचा शिधा, एक रुपयात पिक विमा यांचा उल्लेख नाही, असे अनेक सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारले आहेत.
हेही वाचा
पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस