पुणे: बारामतीमधील निवडणूक आता राजकारणाच्या पलिकडे जाऊन भाऊबंधकीवर पोहोचल्याचं दिसतंय. नणंद विरूद्ध भावजयाच्या लढाईत पवार कुटुंबाने सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची साथ द्यायचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे आपल्या वडिलांची बाजू सांभाळण्यासाठी आता जय पवार (Jay Pawar) मैदानात उतरल्याचं दिसून येतंय. सुप्रिया सुळे आणि जय पवारांच्या भेटीचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जय पवार यांनी त्यावरून सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळेंनी व्हिडीओ काढून खोटी बातमी करायला लावली, त्यांना खोटं बालून काय मिळतं असा सवाल जय पवारांनी केला. तर शरद पवार, रोहित पवारांसाठी भावनिक होणाऱ्या पवार कुटुंबाने अजितदादांसाठीही भावनिक व्हायला हवं असंही ते म्हणाले. 


बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला. त्यासाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. जय पवार यांनी भोर तालुक्यातील गावांमध्ये गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर  निशाणा साधला.


सुप्रिया सुळे मीडियाचा गैरवापर करून खोट्या बातम्या देतात


मीडियाचा गैरवापर कसा करायचा आहे हे सुप्रिया सुळेंना चांगलंच माहिती असल्याची टीका करत जय पवार म्हणाले की, बारामतीमध्ये जैन समाजाच्या कार्यक्रमादरम्यान सुप्रिया ताई आणि मी एकत्र आलो. तेव्हा मी त्यांना बोललो, आत्या तुम्ही पहिला नारळ ठेवा. तर त्या म्हणाल्या, नाही जय, तू आधी ठेव. मग मी नारळ ठेवून त्या ठिकाणी डोळे मिटून प्रार्थना करत होतो. त्याच वेळेस माझ्या शेजारी बारामतीचे शहराचे अध्यक्ष जय पाटील येऊन उभे राहिले. मी प्रार्थना करत असताना सुप्रियाताई म्हणाल्या काय जय कसं चाललंय? मला वाटलं त्या मला म्हणाल्या म्हणून मी डोळे उघडून त्यांना बोललो, आता सगळं बर आहे. मग त्या मला म्हणाल्या, मी तुला नाही, दुसऱ्या जयशी बोलत होते. 


मग त्यांनी ते सर्व व्हिडीओ पत्रकारांना दिले आणि त्यांना सुप्रिया सुळे यांनी जय पवारची विचारपूस केली अशी खोटी बातमी करायला लावली. हे खोटं बोलून त्यांना काय मिळतंय?


दादांसाठीही भावनिक झालं पाहिजे


अजित पवार म्हणाले की, आज ही निवडणूक त्यांनी भावनिक पद्धतीने चालू केलेली आहे.पंधरा वर्षे सुप्रियाताई खासदार होत्या. मला पुरंदरमधले लोक बोलले जर हे दोन गट झाले नसते तर त्यांच्याकडे बोलायला मुद्देच नव्हते. आता हे दोन गट झाले आहेत म्हणून त्यांना भावनिकपणाने बोलायचा मुद्दा आहे. साहेबांच्या बाजूनेच का आपण भावनिक व्हायचं, अजितदादांच्या बाजूने का नाही?


दादांवरती ईडीच्या कारवाई चालू होत्या, दादांवर टीका होत होती. तेव्हा दादांबरोबरच साहेबांवरही टीका होत होती. त्यावेळेस दादा भुजबळांसोबत एकटे ईडीच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळेला कुठे होते कुटुंब? या वेळेस रोहित पवारांवर ईडीची कारवाई झाली तेव्हा त्या ठिकाणी साहेब स्वतः गेले, सुप्रियाताई गेल्या, प्रतिभा आजी स्वतः गेल्या. दादा गेली अनेक वर्षे आपल्यासाठी दिवस-रात्र काम करतायत. मला असं वाटतंय की आपण दादांसाठीपण कुठंतरी भावनिक झालं पाहिजे.


पहाटेच्या शपथविधीचं खरं कुणीच सांगत नाही


जय पवार यांनी पहाटेच्या शपथविधीवरून मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, त्यांनी अनेक वर्ष साहेबांचं सगळंच ऐकलं. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या आधी दादांनी फडणवीसांसोबत शपथविधी केला आणि त्याच दिवशी दुपारी सर्वजण दादांच्या विरोधात गेले. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर हा निर्णय दादांचा स्वतःचा निर्णय होता, तर साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री केलं असतं का? आपल्याला सर्वांना माहिती की साहेब कसे नेते आहेत, असं असतं तर दादांना त्यांनी संधीचं दिली नसती. पण हे खरं कोणी तुम्हाला सांगत नाही.


दादा राज्यात व्यस्त असताना सुनेत्रा पवारांनी विकास केला


जय पवार म्हणाले की, विरोधक फक्त मीडियाचा वापर करून दादांनी काय चुकीचं केलंय हे सांगतात. दादांनी अनेक वर्ष सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. अगदी कोरोना काळातसुद्धा मंत्रालयात कुणी नसायचं तेव्हा दादा एकटे जाऊन बसायचे आणि कुठे काय कमी पडते, कुणाला कायं मदत हवी आहे हे सर्वांना फोन करून पाहात होते. या काळात त्यांना स्वतःला करोना होऊन गेला होता. जेव्हा दादा पूर्ण राज्याच्या कामात व्यस्त होते तेव्हा सुनेत्रा पवारांनी बारामतीचा विकास केलेला आहे.


संसदरत्न पुरस्कार सरकारचा नाही


संसदरत्न पुरस्कारावर बोलताना जय पवार म्हणाले की, आज ते बोलतायत मला संसदरत्न पुरस्कार मिळालाय, त्यांना पुरस्कार मिळालाय पण तुमच्या भोर तालुक्याला काय मिळाल? संसद रत्न पुरस्कार हा सरकारचा नाही, हा पुरस्कार एका एनजीओ मार्फत दिला जातो. त्यामुळे तो असं काही मोठा पुरस्कार नाही.


ही बातमी वाचा: