Jalna News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आता भाजपच्या तीन आमदारांनी थेट अंतरवली सराटीत धडक मारली आहे. शिंदेंच्या एका शिलेदाराचीही या भेटीत हजेरी आहे. आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यासह जालन्यातील काही आमदारही जर अंगींच्या भेटीसाठी अंतरवली सराटीत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या 7 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. राज्यात मराठा आरक्षणप्रश्नी तेढ निर्माण होत असताना पश्चिम दौऱ्याआधी भाजप आमदार आणि मनोज जरांगे यांच्यात  काय चर्चा होतेय याकडे सर्वांचे लक्ष आहे.


दरम्यान मराठा आरक्षणाची सरकारची भूमिका सांगत न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्यावर सरकारचा भर असल्याचे सांगत या प्रश्नावर सकारात्मक चर्चेतून मार्ग निघावा अशी इच्छा असल्याचे आमदार राऊत म्हणाले. 


मराठा आरक्षण प्रश्न तोडगा काढण्यासाठी आमदार एकत्र 


मराठा आरक्षण प्रश्न आंदोलक मनोज जरांगे यांची 7 ऑगस्ट पासून पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली सुरू होणार आहे. दरम्यान मराठा आरक्षण विषयावर तोडगा काढण्यासाठी आज भाजप आमदारांनी अंतरवली सराटी मध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, राणा जगजीत सिंह पाटील यांच्यासह जालन्यातील बदनापूरचे आमदार नारायण कुचे आणि शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे देखील उपस्थित होते. 


विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदारांची भेट महत्त्वाची


राज्यात विधानसभेसाठी सध्या सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून मनोज जरांगे यांनी इच्छुक मराठा उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. येत्या विधानसभेत 150 ते 200 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर आता भाजप आमदारांची अंतरवाली सराटी मधील धडक महत्त्वाची मानली जातेय.


मनोज जरांगे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष 


मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आगामी काळातील आपल्या राजकारणाची काय दिशा असेल याबाबत येत्या 29 ऑगस्टला निर्णय घेऊ, असं म्हंटलं आहे. यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. मनोज जरांगे यांनी आत्ताच निर्णय घेतला नसला तरी आगामी काळातील राजकारणाची त्यांची दिशा काय असेल, याबाबत मात्र सुतोवाच या आधीच केले आहेत.


मनोज जरांगे यांनी आधीच सोशल इंजिनिअरिंग साधत मराठा समाजासोबतच दलित, मुस्लीम आणि धनगर समाजाला आपलंस करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी त्यांनी ओवेसी, बच्चु कडू, प्रकाश आंबेडकर यांना आधीच आवाहन देखील केलं आहे. एकंदरीतच आगामी काळात महायुतीला फायदा होईल, अशा प्रकारचे राजकारण तर मनोज जरांगे यांचे सुरु नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 


हेही वाचा:


मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकणार? राजकीय आखाड्यात उतरल्याने कुणाला फटका, कुणाचा फायदा?