Gujarat: दिल्लीचे (Delhi) उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी गुजरात सरकारच्या इयत्ता 6 वी ते 12 वीच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया म्हणाले आहेत की, ''हा निर्णय निश्चितच एक मोठे पाऊल आहे. परंतु जे लोक हे मांडत आहेत, त्यांनी आधी गीतेची मूल्ये स्वतःच्या जीवनात रुजवली पाहिजेत. त्याची (भाजपची) कृत्ये रावणासारखी आहेत आणि ते गीतेबद्दल बोलतायत.''


गुरुवारी गुजरातचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी घोषणा केली होती की, शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यास क्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्यात येणार आहे. जितू वाघानी म्हणाले होते की, "भगवद्गीतेची मूल्ये, तत्त्वे आणि महत्त्व सर्व धर्माच्या लोकांनी स्वीकारले आहे. श्रीमद भगवत गीता इयत्ता 6 मधील विद्यार्थ्यांना त्यात रस वाटेल अशा पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. गुजरातमधील भाजप सरकारने जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटले आहे की, शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेला कथा आणि धड्याच्या स्वरूपात पुस्तकांमध्ये सादर करण्यात येणार आहे. या परिपत्रकात पुढे सांगण्यात आले आले की, इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचा 'सखोल परिचय' दिला जाईल.


दिल्ली महापालिका निवडणुकीवरून भाजप-आप आमनेसामने 


दिल्लीत एप्रिलमध्ये महापालिकांची मुद्दत संपणार आहे. मात्र अद्यापही निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही. याबाबत लवकरच घोषणा करणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते. मात्र आता त्यालाही 10 दिवस उलटून गेले आहेत. केंद्र सरकाराच्या हस्तक्षेपानंतर ही निवणूक थांबवण्यात आली आहे. केंद्र सरकराने एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यात सांगण्यात आले आहे की, तीन भागांमध्ये विभागलेल्या दिल्ली महानगरपालिकांना (एमसीडी) पुन्हा एकत्र करण्याच्या निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे ही निवडणूक लांबणीवर गेली असल्याचे सांगण्यात येत आहेत. यावरूनच आता दिल्लीत सत्तेत असलेल्या आपने भाजपवर हल्लाबोल केला आहे. पराभवाच्या भीतीने ही निवडणूक पुढे ढकलण्याचा भाजपचा हा डाव असल्याचे आपचे म्हणणे आहे.